टीम इंडियावर दुहेरी संकट! दुसऱ्या कसोटीतून 'हे' 2 स्टार खेळाडू बाहेर? 'क्रिकेटचा हा नियम' बदलणार!
IND vs SA 2nd Test Gill, Kuldeep Yadav Out BCCI Breaks 100-Year Test Cricket Rule : कोलकाता कसोटीत दारुण पराभव पत्करल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरी आणि अंतिम कसोटी गुवाहाटी येथे होणार आहे. मालिकेतील पराभव टाळण्यासाठी ही लढत भारतासाठी करो या मरो अशी आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वीच टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. दोन प्रमुख खेळाडू या सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, गुवाहटी कसोटी सामन्यात १०० वर्षांहून अधिक काळ पाळला गेलेला कसोटी क्रिकेटचा एक ऐतिहासिक नियम मोडला जाणार आहे! या संदर्भात वनइंडिया हिंदीने वृत्त दिले आहे.

गिलच्या मानेचं दुखणं कायम; कुलदीपची लग्नघाई
गुवाहाटी कसोटीपूर्वी टीम इंडियाला दुहेरी फटका बसण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटीच्या अखेरच्या डावात फलंदाजीसाठी न आलेला स्टार फलंदाज शुभमन गिल याच्या मानेची समस्या (मानेतील जकडण) अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही. त्याला रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते, मात्र त्याच्या खेळण्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. गिल बाहेर पडल्यास, रिषभ पंत संघाचे कर्णधारपद सांभाळेल.
कुलदीप यादवची सुट्टी
संघाला दुसरा मोठा धक्का बसणार आहे तो म्हणजे फिरकीपटू कुलदीप यादव याच्यामुळे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कुलदीपचे त्याच्या बालपणीच्या मैत्रिणी वंशिका हिच्याशी लग्न होणार आहे. त्यामुळे त्याने सुट्टी मागितली असून, त्याचे गुवाहाटी कसोटीतून बाहेर पडणे निश्चित मानले जात आहे. कुलदीप बाहेर झाल्यास संघात कोणताही विशेषज्ञ फिरकीपटू बेंचवर नसल्याने रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकीच निवड करावी लागेल.
कसोटी क्रिकेटचा १०० वर्षांचा नियम मोडणार!
गुवाहाटी कसोटीत सर्वात मोठी आणि ऐतिहासिक गोष्ट घडणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये गेली १०० हून अधिक वर्षे पाळला जाणारा एक नियम बदलणार आहे.
'तो' नियम कोणता?
आजवर कसोटी सामन्यात पहिल्या सत्रापूर्वी लंच (दुपारचे जेवण) घेतले जायचे आणि तिसऱ्या सत्रापूर्वी टी-ब्रेक घेतला जायचा. मात्र, गुवाहाटी कसोटीमध्ये या नियमाचा क्रम बदलला जाणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार, सामना सुरू होण्याची वेळ अर्धा तास पुढे करण्यात आली आहे. टॉस सकाळी ८:३० वाजता होईल. सामन्याचे पहिले सत्र सकाळी ९:०० वाजता सुरू होईल आणि सकाळी ११:०० वाजेपर्यंत चालेल.
बदलाचे कारण काय?
पूर्वोत्तर भागातील (ईशान्य भारत) गुवाहाटीमध्ये सूर्योदय लवकर होतो आणि सूर्यास्तही लवकर होतो. संध्याकाळच्या वेळी अपुऱ्या प्रकाशामुळे सामन्यात कोणताही विलंब होऊ नये, यासाठी बीसीसीआयने सत्राची वेळ बदलण्याचा आणि लंच ब्रेक व टी-ब्रेकचा क्रम बदलण्याचा हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
गुवाहाटीत करो या मरोची लढाई
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही दुसरी आणि अंतिम कसोटी गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर २२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान खेळली जाईल. मालिका वाचवण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल.












Click it and Unblock the Notifications