IND Vs PAK सामन्यासाठी ब्रॉडकास्टरांची छप्परफाड कमाई; 10 सेकंद जाहिरातीचे रेट दुप्पट, हॉटेल्स..
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील सर्वात हॉट सामना म्हणून भारत पाकिस्तान सामना ओळखला जातो. उद्या रविवारी दुपारी सामन्याला दुबईमध्ये सुरुवात होणार आहे. भारत पाकिस्तान यांच्यामधील क्रिकेट सामना केवळ खेळच म्हणून नाही तर दोन्ही देशातील संबंधावरुन हा सामना अतिशय महत्त्वाचा ठरणारा आहे. चाहत्यांव्यतिरिक्त या सामन्यासाठी बाजारपेठेमध्ये खूप उत्साह आणि चर्चा सुरू आहे. त्यामुळेच की काय या सामन्याचे प्रसारण करणाऱ्या ब्रॉडकॉस्ट कंपन्यांनी त्यांच्या टीव्ही जाहिरातींची किंमत दुप्पटीने वाढवली आहे.
एका रिपोर्टनुसार, या सामन्याच्या 10 सेकंदांच्या जाहिरातीची किंमत सुमारे 50 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. असे असूनही, कंपन्या या जाहिरातीला वेळ मिळवा म्हणून रांगेत उभ्या आहेत. तर आतापर्यंत 19 कंपन्यांनी जाहिराती बुक केल्या आहेत. जर आपण इतर सामन्यांबद्दल बोललो तर, 10 सेकंदांच्या जाहिरातीचा खर्च सुमारे 20 ते 25 लाख रुपये असते. परंतु भारत पाक सामन्याच्या दरम्यान जाहिरात दिसावी म्हणून प्रत्येकी दहा सेकंदासाठी दुप्पट किंमत आकारली जात आहे.

आयसीसीने 2014 ते 2017 पर्यंतच्या सर्व स्पर्धांसाठी प्रसारकांशी सुमारे 2,543 कोटी रुपयांचा ($३ अब्ज) करार केला आहे. कोणत्याही आयसीसी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा ब्रॉडकास्टर्सच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत असतो, कारण त्यात सर्वाधिक प्रेक्षकसंख्या असते. या कारणास्तव प्रसारक या सामन्यासाठी जाहिरातींच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढवतात.
दुबईतील हॉटेल्सचे रेट तिप्पट महागले
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी दुबईतील लहान आणि मोठ्या हॉटेल्समध्ये 99 टक्के बुकिंग झाले आहे. एका अहवालानुसार, हॉटेलचे भाडे तीन पटीने वाढले आहे. साधारणपणे दररोज 3000 रुपये भाडे असणार्या हॉटेलचे भाडे 23 फेब्रुवारी रोजी 10 हजारांवर जाऊन पोहोचले आहे.
विमान तिकीटाच्या किमतीही वाढल्या
हा शानदार सामना पाहण्यासाठी भारतातील विविध राज्यांमधून हजारो चाहते दुबईत पोहोचत आहेत. अशा परिस्थितीत, विमान कंपन्या देखील भरपूर पैसे कमवत आहेत आणि त्यांच्या तिकिटांच्या किमतीही गगनाला भिडू लागल्या आहेत. एका अहवालानुसार, दिल्ली ते दुबईचे विमान तिकीट जे साधारणपणे 11 ते 13 हजार रुपये होते ते आता 40 हजार रुपयांवर पोहोचले आहे.
अतिरिक्त तिकीटे तासाभरात विकली
भारत-पाकिस्तान सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाईल, ज्याची आसन क्षमता पंचवीस हजार आहे. या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. आयसीसीने अलीकडेच काही अतिरिक्त तिकिटे देखील जारी केली होती, जी एका तासातच विकली गेली. भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची मागणी इतकी जास्त आहे की अनेक वेबसाइट्स ती चार ते पाच लाख रुपयांना विक्री करत आहेत.
दर्शकसंख्येचे रेकॉर्ड मोडणार?
एका वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तान सामन्यात प्रेक्षकांच्या संख्येचे मागील सर्व रेकॉर्ड मोडले जाऊ शकतात. दोन्ही देशांमधील शेवटचा सामना 9 जून रोजी आयसीसी T-20 विश्वचषकादरम्यान झाला होता, जेव्हा भारतीय संघाने तो सामना सहा धावांनी जिंकला होता. त्या सामन्याची प्रेक्षकसंख्या सुमारे 2.73 कोटी होती.












Click it and Unblock the Notifications