'जे काही झाले, ते झाले...'; आशिया कप ट्रॉफी वादावर PCB प्रमुख नक्वी झुकले, मागितली अखेर 'माफी'!
PCB Chief Apology : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे प्रमुख मोहसीन नक्वी यांनी आशिया कप २०२५ (Asia Cup 2025) च्या अंतिम सामन्यानंतर झालेल्या वादग्रस्त घटनेबद्दल अखेर भारताची माफी मागितली आहे.
पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी हे आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत. आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून विक्रमी नवव्यांदा विजेतेपद पटकावले होते. या विजयानंतर बक्षीस वितरण समारंभात मोठा वाद निर्माण झाला होता.

नेमका वाद काय होता?
अंतिम सामन्यानंतर, विजेते भारतीय संघाने मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. राजकीय तणावामुळे आणि नक्वी यांनी केलेल्या भारतविरोधी वक्तव्यांमुळे भारतीय खेळाडूंनी हा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने ट्रॉफी नाकारल्यानंतर, मोहसीन नक्वी यांनी कथितरित्या विजेत्यांची ट्रॉफी आणि पदके स्वतःच्या हॉटेलमध्ये घेऊन गेले, ज्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. भारतीय संघाने ट्रॉफीशिवायच विजयाचा आनंद साजरा केला होता.
नक्वी यांची 'माफी' आणि स्पष्टीकरण
या संपूर्ण प्रकरणावर मोठी टीका झाल्यानंतर, पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांनी भारताची माफी मागितली आहे. त्यांनी कबूल केले की, "आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यानंतर जे घडले, ते घडायला नको होते." ट्रॉफीच्या वादावर भाष्य करताना त्यांनी मोजक्या शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली. "जे काही झाले, ते झाले... त्या क्षणी (बक्षीस वितरण समारंभात) काय घडले याबद्दल मला खेद वाटतो. ते व्हायला नको होते." अशा प्रकारचे गैर-खेळाडूवृत्तीचे वर्तन क्रिकेटच्या भावनेविरुद्ध आहे आणि भविष्यात असे प्रकार टाळले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे वृत्त आहे.
बीसीसीआय आणि आयसीसी मध्ये तक्रार!
या संपूर्ण प्रकरणानंतर बीसीसीआयने नक्वी यांच्या कृतीचा तीव्र निषेध केला होता आणि आयसीसीच्या आगामी बैठकीत हा मुद्दा गांभीर्याने उपस्थित करण्याची भूमिका घेतली होती. नक्वी यांनी 'माफी' मागितली असली तरी, बीसीसीआय या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, ट्रॉफी भारताला कधी आणि कशी परत मिळणार, याबाबत अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.












Click it and Unblock the Notifications