इंग्लंड विरुद्ध भारताचा कटकमध्ये झालेला 'तो' सामना आठवतोय..? फक्त एका धावेवरुन ठरली होती हार-जीत
भारत आणि इंग्लंडमध्ये आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना रंगणार आहे. कटक येथील बाराबती स्टेडीअमवर तो होईल. त्यापूर्वी नागपूर येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडवर चार विकेट्सने जिंकला होता. तीन सामन्यांच्या या मालिकेतील आजचा सामना जिंकून भारत २-० अशी अजिंक्य आघाडी मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे कटकचा हा सामना चांगलाच चर्चेत आला आहे. मात्र यापूर्वी ४० वर्षांपूर्वी म्हणजेच २७ डिसेंबर १९८४ साली कटकमध्ये या दोन्ही देशांत असा सामना झाला होता, ज्याची हारजीत ही एका धावेवरुन ठरली होती. तो सामना क्रिकेट रसिकांच्या मनावर आजही जसाच्या तसा कोरलेला आहे.

काय झाले होते कटकमध्ये?
२७ डिसेंबर १९८४ साली कटकमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात एक रोमांचक सामना झाला होता. इंग्लंडचा कर्णधार डेव्हिड ग्राँवर होता तर भारतीय संघाचे नेतृत्त्व कर्णधार सुनील गावस्कर करत होता. या सामन्यात नाणेफेक गमावून भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. भारताने पाच विकेट गमावून २५२ धावा केल्या. भारताकडून के. श्रीकांत व रवी शास्त्री यांनी पहिल्या विकेटसाठी १८८ धावांची भागिदारी केली होती. शास्त्री यांनी शतक ठोकले मात्र श्रीकांतचे शतक फक्त एका धावेने हुकले होते.
शास्त्रीने केले होते शतक
रवी शास्त्री याने १४२ चेंडू खेळत या सामन्यात १०२ धावा केल्या. त्यात सहा चौकार व एका षटकाराचा समावेश होता. श्रीकांतने १११ चेंडूत ९९ धावा केल्या. त्याला माईक गेटींगने एलबीडब्लू आऊट केले. श्रीकांतनेही चार चौकार व तीन षटकार लगावले होते. या दोघांनी चांगली सुरुवात करुन दिल्यानंतरही भारताच्या पुढच्या फलंदाजांना खेळपट्टीवर दम धरता आला नाही. भारताला २७५ धावांच्या जवळही पोहोचता आले नाही.
इंग्लंडची खराब सुरुवात
लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाला. संघाच्या तीन धावा असतानाच टीम राँबिन्सला मनोज प्रभाकरने बाद केले. ग्रॅमी फाउलरही काही करु शकला नाही. तो १५ धावांवर असताना राँजर बिन्नी याने त्याला आऊट केले. त्यानंतर आलेल्या माईक गॅटिंगने मात्र शानदार अर्धशतक ठोकले. मात्र संघाची धावसंख्या १४५ असताना इंग्लंडचा निम्मा संघ पॅव्हिलीयनमध्ये परतला होता.
इंग्लंडचा एका धावेने विजय
त्यानंतर पाँल डाऊनटन ४४ विक मार्क्स ४४ यांनी सहाव्या विकेटसाठी भारतीय गोलंदाजांना थकवले. मार्क्स धावबाद झाल्यानंतर रिचर्ड एलिसन याने डाऊनटनची साथ देत ३८ धावांची भागिदारी केली. इंग्लंडने ४६ षटके खेळली तेव्हा इंग्लंडचा स्कोअर ६ बाद २४१ होता. परंतु खराब सुर्यप्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला. तेव्हा चांगल्या स्कोरिंग रेटमुळे इंग्लंडला एका धावेने विजयी घोषित करण्यात आले.












Click it and Unblock the Notifications