धनंजय मुंडे भाजपमधून राष्ट्रवादीत का गेले होते? गोपीनाथ मुंडेंसोबत पहिला वाद का अन् कधी झाला?
Why did Dhananjay Munde leave BJP and join NCP : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे संरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि खुनानंतर धनंजय मुंडे यांच्या वाल्मिक कराड या निकटवर्तीयाला या प्रकरणात अटक झाली. यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे असलेले संबंध चर्चेत आले, त्यावरुन धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यावा या मागणीनं जोर धरला. त्यानंतर ज्यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आले, त्यानंतर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.
आता धनंजय मुंडे यांची आणि त्यांनी दिलेल्या राजीनाम्याची जोरदार चर्चा होत आहे. त्यातच मुंडे यांनी दिलेला राजीनामा हा वैद्यकीय कारणांमुळे दिला ही बाबही मुंडे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हे नाव कायम चर्चेत असतं. धनंजय मुंडे आणि वाद हे जणू समीकरणच झालंय. कुठल्या न कुठल्या पद्धतीनं धनंजय मुंडे हे कायम बातम्यांमध्ये असतात. गेल्या काही महिन्यांपासून धनंजय मुंडे हे सातत्याने वादात आहेत. त्याच कारण म्हणजे बीडमधील संतोष देशमुख प्रकरण. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना निघृणपणे संपवल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हादरला.
बीडमधील गुन्हेगारी विश्वाचं सगळं स्वरुप महाराष्ट्रासमोर आलं. वाल्मिक कराड पकडला गेला आणि पुन्हा एकदा आरोपांच्या चौकटीत सापडले ते धनंजय मुंडे. तीन महिन्यांपासून सुरु असलेली धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अखेरीस 4 मार्चच्या सकाळी पूर्ण झाली. धनंजय मुंडे यांनी त्यांचे पीए प्रशांत जोशी यांच्या हातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांचा राजीनामा सोपवला.
धनंजय मुंडे भाजपमधून राष्ट्रवादीत का गेले?
भाजपमध्ये असलेले धनंजय मुंडे राष्ट्रवादीसोबत का गेले? हा प्रश्न अनेकांना पडतो, त्याचे एक कारण म्हणजे कौटुंबिक पातळीवरील राजकारण होय. त्यांचे काका गोपीनाथ मुंडेंसोबत धनंजय मुंडे यांचं नेमकं काय बिनसलं होतं. आपण जाणून घेऊया.
धनंजय मुंडे म्हणजे प्रभावी वक्ते. भाजपच्या मुशीत आणि गोपीनाथ मुंडेंसारख्या दमदार नेत्याच्या सावलीत तयार झालेले नेते. गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडे सांभाळतील असं सगळ्यांना वाटत होतं. मात्र घडलं वेगळचं. महाराष्ट्राला काका-पुतण्याचा अध्याय नवा नाही. त्याला मुंडे सुद्धा कसे चुकतील?
बीड जिल्ह्यातील नाथरा या गावात धनंजय मुंडेंचा जन्म झाला. त्यांचे काका आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना राजकारणाच्या प्रवाहात आणलं. 2007 साली भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी धनंजय मुंडे यांची निवड करण्यात आली. धनंजय मुंडेंवर परळीची जबाबदारी सोपवत गोपीनाथराव मुंडे राज्याच्या राजकारणात लक्ष घालत होते.
...म्हणून कुटुंबात पडली फूट
2009 सालं उजाडलं आणि सुरु झाला काका-पुतण्यातील संघर्ष. 2009 ला परळी विधानसभा निवडणुकीसाठी धनंजय मुंडेंना डावलत पंकजा मुंडे यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. तेव्हा धनंजय मुंडे कमालीचे नाराज झाले. नंतर परळी नगरपरिषदेच्या नगरअध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी आपल्या समर्थकाला उमेदवारी देण्याची मागणी केली. मात्र गोपीनाथरावांनी त्यास विरोध केला. या वादामुळे मुंडे कुटुंबात तेव्हा फूट पडली.
2014 मध्ये धनंजय मुंडेविरोधात पंकजा मुंडे लढत
2012 साली धनंजय मुंडे यांनी तेव्हा एकसंघ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2014 ला त्यांना पंकजा मुंडेंविरोधात उमेदवारी देण्यात आली. मात्र धनंजय मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. नंतर त्यांना विधानपरिषदेवर घेतल्या गेलं. विधानपरिषदेचं विरोधीपक्षनेतेपद ही देण्यात आलं. धनंजय मुंडे मोठे होत गेले. 2019 ला पंकजा मुंडेंना पराभूत करत धनंजय मुंडे विधानसभेत गेले. ते मंत्री झाले, सोबत बीडचे पालकमंत्रीही झाले. नंतर मराठा आरक्षण, मराठा-ओबीसी वाद, करुणा मुंडे प्रकरण असं सगळं जे काही झालं ते सगळ्यांनीच पाहिलं.
आमदारकी पण जाणार का?
आता मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंची आमदारकी पण जाणार का? त्यांच पुढे काय होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आत जे होईल ते होईल पण सध्या तरी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाला संतोष देशमुख प्रकरणामुळे धक्का बसला, त्यामुळे आता पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications