Shiv jayanti 2025 : वर्षातून 3 वेळा साजरी केली जाते शिवजयंती; काय आहे शिवरायांच्या जन्मतारखेचा वाद?
Shiv jayanti 2025 : शिवरायांचे स्वराज्य, शिवरायांचे विचार, शिवरायांचा प्रताप, शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ, शिवरायांचा गनिमी कावा..शिवरायांच्या अगाध किर्तीपासून तर त्यांच्या शौर्यापर्यंत अशा अनेक गोष्टी सांगता येतील. एक कुशल राज्यकर्ता, एक पराक्रमी योद्धा आणि मुघलांचा पराभव करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जरी 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला असला तरी यावेळी त्यांची जयंती 16 मार्च रोजी साजरी केली जात आहे. ही जयंती तिथीनुसार आहे. शिवजयंती नेमकी कोणत्या तारखेला, तारीख की तिथी यावरुन यापुर्वी अनेकदा वादविवाद झालेले आहेत. त्यामुळे त्यांची नेमकी जयंती कधी हे तत्कालिन राज्य सरकारने काही ऐतिहासिक संदर्भासह निश्चित केले आहे, पण आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तारखेचा नेमका वाद काय आहे हे जाणून घेऊया.

यापुर्वी झाला होता वाद?
यापुर्वी महाराष्ट्रातील तत्कालीन शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारने 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा वाद पुन्हा एकदा समोर आला होता. मुळातः शिवसेना विरोधी पक्षात असताना शिवजयंती हिंदू कॅलेंडरच्या जुन्या तारखेनुसारच साजरी झाली पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. शिवनेरी किल्ल्यावर 1630 मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला असे म्हटले जाते, परंतु त्यांच्या जन्मतारखेचा वाद अजूनही कायम आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 6 एप्रिल 1627 रोजी झाला?
सण 2000 मध्ये महाराष्ट्र विधानसभेत पारित झालेल्या ठरावानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला होता. पंचांगानुसार बघितले तर शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी, 1551 शके संवत्सर या दिवशी झाला. त्यापूर्वी शिवरायांची जन्मतारीख ही वैशाख महिन्याची दुसरी तारीख, 1549 शके संवत्सर मानली जात होती. त्यांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 6 एप्रिल 1627 रोजी झाला.
नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, स्वातंत्र्यसेनानी बाळ गंगाधर टिळक आणि अभ्यासकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख शोधण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावर आपले मत मांडले होते. टिळकांनी 1990 च्या त्यांच्या केसरी मासिकाच्या 14 एप्रिलच्या आवृत्तीत या विषयावर सविस्तर माहिती दिली होती. टिळकांनीही स्पष्ट केले की शिवाजी महाराजांची जन्मतारीख निश्चित करण्यासाठी कोणतीही खात्रीशीर माहिती नाही. त्यानंतर काही लेखांचा आधार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख 6 एप्रिल 1627 ही मानली गेली आणि त्या आधारावर 6 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाऊ लागली.
महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या सरकारांनी काय काय केले?
- 1966 मध्ये महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख निश्चित करण्यासाठी इतिहासकारांची एक समिती स्थापन केली होती.
- इतिहासकारांची समिती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला होता या निष्कर्षावर समिती पोहचली होती.
- समितीचा भाग असलेले इतिहासकार एन. आर. फाटक यांनी शिवरायांचा जन्म वैशाख शुक्ल द्वितीया शके 1549 म्हणजेच 6 एप्रिल 1927 रोजी झाला असा निष्कर्ष काढला.
- समितीची दुसरी बैठक झाली तेव्हा इतिहासकारांनी कबूल केले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख निश्चित करण्यासाठी कोणतीही कागदपत्रे नाहीत.
- नंतर असे ठरले की जोपर्यंत इतिहासकारांमध्ये एकमत होत नाही तोपर्यंत जुनी तारीख म्हणजे 6 एप्रिल हीच छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख मानली जावी.
जन्मतारखेबद्दल मतभेद
महाराष्ट्राच्या माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी मागील समितीचा अहवाल आणि इतर काही पुरावे 2000 साली महाराष्ट्र सरकारसमोर मांडले होते. यानंतर 19 फेब्रुवारी 1630 रोजी विधानसभेत ठराव पारित करण्यात आला. त्यास तत्कालीन विलासराव देशमुख सरकारच्या मंत्रिमंडळाची मान्यताही मिळाली आणि निर्णयाची अंमलबजावणी झाली. मात्र, त्यावेळी विरोधक असलेल्या शिवसेनेने याला कडाडून विरोध केला होता. तर दुसरीकडे शिवजयंती तिथीनुसार शिवसेना साजरी करु लागली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेवर सुमारे शंभर वर्षे संशोधन झाले, तरीही शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबाबत मतभेद कायम आहेत. काही ठिकाणी जुन्या तारखेला म्हणजे 6 एप्रिल, काही ठिकाणी 19 फेब्रुवारीला साजरी करतात, त्यातच तिथीनुसार, शिवजयंती दरवर्षी वेगवेगळ्या दिवशी आणि तारखांना येते.












Click it and Unblock the Notifications