मोठी बातमी : शरद पवार राजकारणातून निवृत्त होणार?, म्हणाले- 14 वेळा रिंगणात उतरलो, आता थांबले पाहिजे
Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसदीय राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत दिलेत. आतापर्यंत मी 14 निवडणुका लढल्या आहेत, आणखी किती लढवायच्या? कुठेतरी थांबले पाहिजे. नवी पिढी समोर यावी हे सूत्र हाती घेऊन मी आता कामाला लागलो आहे, असे म्हणत त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले.
बारामती येथे आयोजित एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे विधान केल्याने राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार सध्या आपले नातू तथा बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार युगेंद्र पवार यांच्यासाठी प्रचारसभा घेत आहेत. त्यांनी मंगळवारी एका प्रचारसभेला संबोधित करताना संसदीय राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत दिले.

तुम्ही मला एकदाही घरी पाठवले नाही
कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, मी सध्या सरकारमध्ये नाही. माझ्या राज्यसभेचे अजून दीड वर्षे शिल्लक आहेत. त्यानंतर पुन्हा राज्यसभेवर जायचे की नाही याचा मला विचार करावा लागेल. मी आता लोकसभाच नाही तर कोणतीही निवडणूक लढवणार नाही. किती निवडणुका लढवायच्या. आतापर्यंत 14 निवडणुका लढल्या. तुम्ही एकदाही घरी पाठवले नाही.
पण, कुठेतरी थांबले पाहिजे..
शरद पवार म्हणाले की, बारामतीच्या जनतेते मला दरवेळी मला निवडून दिले. पण आता कुठेतरी थांबले पाहिजे. नवी पिढी समोर यावी हे सूत्र हाती घेऊन आता मी कामाला लागलो आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने युगेंद्र पवार यांना पाठिंबा दिला आहे. हे एक नवीन नेतृत्व आहे. त्यांना तुम्ही साथ दिली पाहिजे. राज्यात आपल्या विचारांचे सरकार आले तर युगेंद्र भक्कमपणे तुमचे प्रश्न सोडवेल.
मला केवळ लोकांचे प्रश्न सोडवायचे..
शरद पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, काही लोक माझ्यावर भावनेचे राजकारण करण्याचा आरोप करतात. पण मला तसे काहीच करण्याची गरज नाही. मी माझ्या लोकांना ओळखतो. उद्याच्या निवडणुकीत आपण आपले प्रश्न सोडवूया. आता मला आमदारकी नको, खासदारकीही नको, मला केवळ लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. उद्या आपल्या विचारांचे सरकार राज्यात आले तर युगेंद्र भक्कमपणे बारामतीचे प्रश्न सोडवेल.












Click it and Unblock the Notifications