साताऱ्यात 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, पण खुर्ची धोक्यात? जिल्हा परिषद अध्यक्षांचे प्रमाणपत्रच 'बोगस'?
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सध्या जिल्ह्याच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला असून, भाजपच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार शशिकांत शिंदे यांनी गंभीर आरोप केले आहेत. प्रिया शिंदे यांनी अध्यक्षपद मिळवण्यासाठी बोगस ओबीसी प्रमाणपत्राचा आधार घेतल्याचा दावा करत, या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी शशिकांत शिंदे यांनी थेट विधिमंडळ अधिवेशनात केली आहे. या आरोपामुळे सातारा जिल्हा परिषदेची सत्ता मिळवणाऱ्या भाजपच्या विजयाला आता वादाची फोडणी मिळाली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपकडे स्पष्ट बहुमत नसतानाही मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्या रणनीतीमुळे भाजपने सत्ता काबीज करण्यात यश मिळवले होते. मात्र, या निवडीच्या कायदेशीर वैधतेवरच आता शशिकांत शिंदे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, प्रिया शिंदे या मुळात खुल्या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत, तरीही त्यांनी ओबीसी आरक्षित असलेल्या अध्यक्षपदासाठी केवळ निवडीच्या दिवशी सकाळी घाईघाईने प्रमाणपत्र मिळवले. केवळ पदाच्या हव्यासापोटी प्रशासनावर दबाव आणून हे खोटे दाखले गोळा केले गेल्याचा आरोप त्यांनी सभागृहात केला.
या निवडणुकीने सातारा जिल्ह्यातील महायुतीमधील अंतर्गत कलहही चव्हाट्यावर आणला आहे. भाजपने 'स्वबळा'चा नारा देत मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना डावलल्याने राजकीय समीकरणे कमालीची बिघडली होती. मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांनी महाविकास आघाडीशी हातमिळवणी करून भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु 'ऑपरेशन लोटस'च्या माध्यमातून भाजपने विरोधातील पाच सदस्य फोडून सत्तेचे गणित आपल्या बाजूने वळवले. या सत्तासंघर्षामुळे युतीच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेली दरी आता अधिकच रुंदावली असून, बोगस प्रमाणपत्राच्या प्रकरणामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications