धर्मवीर आनंद दिघेंचा घातपात झालाय, त्यांना मारलं गेलं, शिवसेनेच्या आमदाराचा गंभीर आरोप
Sanjay Shirsat on Anand Dighe : धर्मवीर आनंद दिघे यांना मारलं गेलं, हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील लोकांना माहिती आहे. त्यांचा अपघात नव्हे तर घातपात झालेला होता, असा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा आमदार संजय शिरसाट यांनी केला. ते शनिवारी माध्यमांशी बोलत होते.
आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत धर्मवीर चित्रपटाचा भाग दुसरा रिलीज झाला आहे. यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी शिरसाट यांना प्रश्न केला असता त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, ज्या हॉस्पिटलमध्ये दिघेंवर उपचार सुरू होते, ते हॉस्पिटल कायम बंद का करण्यात आले, त्यामुळे आनंद दिघे यांचा मृत्यू का व कसा झाला, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

दिघेंच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी
संजय शिरसाट म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून दिघे यांचा मृत्यू कसा झाला याच्याबद्दल आमच्या मनात शंका आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे या प्रकरणात चौकशी करण्यात यावी, अशी माझी मागणी आहे. तसेच इतके वर्ष झाले ते हॉस्पिटल सुरू का झाले नाही, ही सर्वांच्या मनात शंका कायम आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये नेत्यांचे मृत्यू झाले आहेत. मात्र, ते हॉस्पिटल कधीही बंद झाले नाहीत. मात्र इथेच असे का झाले, अशी शंका देखील त्यांनी उपस्थित केली.
धर्मवीर सिनेमावर केले भाष्य
धर्मवीर सिनेमांमध्ये अनेक प्रकरणातील वास्तव मांडण्यात आले आहेत. मात्र विरोधकांना कुठल्या गोष्टींची माहिती नसल्यामुळे त्यांच्या पोटात पोटशूळ उठला असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला. दरम्यान, शिरसाट यांच्या आरोपानंतर आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातून काय प्रतिक्रिया येणार, याची उत्सुकता आहे.












Click it and Unblock the Notifications