सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंचे काँग्रेस हायकमांडपुढे लोटांगण! 'या' बड्या नेत्याची बोचरी टीका
मुंबई : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असताना राष्ट्रीय नेते चर्चेसाठी मातोश्रीची पायरी चढायचे हे देशाने पाहिले आहे. मात्र उद्धव ठाकरे सत्तेच्या लालसेपोटी लाचारी पत्करुन दिल्लीतल्या काँग्रेस हायकमांडपुढे लोटांगण घालत आहेत, अशी टीका शिवसेना उपनेते संजय निरुपम यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली.
निरुपम म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी डझनभर नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यांचे सरकार येणार नाहीच पण तरीही मविआतला प्रत्येक नेता मुख्यमंत्री बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.

उद्धव ठाकरे सीएम होणार नाहीत
निरुपम म्हणाले, मविआतील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून आपल्याच नावावर शिक्कामोर्तब व्हावे, यासाठीच उद्धव ठाकरे दिल्लीत गेले आहेत. मात्र शरद पवार हे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणार नाहीत. त्यामुळे पवारांवर दबाव टाकण्यासाठी ते इंडीया आघाडीच्या इतर नेत्यांना भेटणार आहेत.
वक्फ बोर्डावर लँडमाफिया बसले
वक्फ बोर्डाबाबत निरुपम म्हणाले की, लष्कर आणि रेल्वेनंतर वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक जमीन आहे. जवळपास आठ लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे. वक्फ बोर्डावर लॅंड माफिया बसलेले असून ते धर्माच्या नावाने देशातील कोट्यवधी रुपयांच्या जमीनी लुटत आहेत.
वक्फ बोर्डावर ठाकरे बोलत का नाही?
संजय निरुपम म्हणाले, वक्फ बोर्डाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्राने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणले आहे. मात्र या विधेयकाला इंडीया आघाडीने विरोध केला आहे. जे वक्फ बोर्ड देशातील संपत्तीची लूट करतेय ही लूट थांबवण्यासाठी विधेयक येत असल्यास त्यावर उद्धव ठाकरे का बोलत नाहीत, असा परखड सवाल निरुपम यांनी केला.
वक्फ बोर्डाला मनमानी अधिकार
संजय निरुपम म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना नियुक्त केलेल्या सच्चर आयोगाने वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करण्याची शिफारस केली होती मात्र काँग्रेसने त्याकडे दुर्लक्ष केले आणि वक्फ बोर्डाला मनमानी अधिकार दिले. मात्र ही चूक आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सुधारत आहेत.
उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज दिल्लीत दाखल झाले. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे, आमदार अनिल परब आहेत.
उद्वव ठाकरे यांचं शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. आजपासून पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात उध्दव ठाकरे कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह आम आदमी पक्ष,तृणमूल कॉंग्रेस, समाजवादी पक्ष आदी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर उध्दव ठाकरे पहिल्यांदाच दिल्लीत आले आहे.












Click it and Unblock the Notifications