बालेकिल्ल्यातच रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घेरलं; घोषणाबाजी, आरक्षणासाठी पाठपुराव्याची मागणी
Raosaheb Danve : माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे यांना भोकरदन तालुक्यातील नांदखेडा येथे मराठा आंदोलकांनी घेराव घातल्याची घटना समोर आली आहे.
मराठा आंदोलकांनी आपल्या मागण्याचे निवेदन दानवे यांना दिले आहे. शिवाय, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. दरम्यान, यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ वातावरण चांगलेच तापले होते.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी रावसाहेब दानवे यांचे मतदारसंघात दौरे सुरू आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते गावागावात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेट घेत आहेत. ते भोकरदन तालुक्यातील नांदखेडा या गावात एका बैठकीसाठी गेले होते. तेव्हा गावातील मराठा आंदोलकांनी रावसाहेब दानवे यांना घेराव घातला. 'एक मराठा, लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे', अशा घोषणा दिल्याने बैठकीच्या ठिकाणी वातावरण चांगलेच तापले होते. अखेर दानवे यांनी तुमच्या मागण्या मला माहिती आहेत, माझा देखील पाठपुरावा व समर्थन त्यास असल्याचे सांगितले. अखेर आंदोलकांनी दानवे यांना निवेदन दिले.

संभाजीनगरातही दानवेंना घातला होता घेराव
यापूर्वी लोकसभा निवडणुकीवेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये पळशी गावात प्रचारासाठी आलेल्या रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला होता. यावेळी मराठा आंदोलक अन् भाजप कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता.
आरक्षणाच्या मागणीसाठी एसटी पेटवली
बीडमध्ये मराठा आंदोलक हिंसक झाल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुवारी रात्री काही मराठा आंदोलकांनी एसटीबस पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बसमधून चालक व मेकॅनिकला बाहेर काढत गाडीत पेट्रोल ओतले व आग लावली. या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले आहे. बसमधील चार सीट्स जळून खाक झाल्या.
मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, फडणवीस काही स्वतःच्या घरातील वाडवडिलांचे पैसे देत नाहीत. लाडक्या बहिणींचे झाले. आता सरकारने त्यांच्या भाच्यांचा विचार करून मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे. नाही तर दाजी थेट रुमणे हाती घेऊन मुंबई गाठतील आणि मग सरकारला महागात पडेल,असा इशारा जरांगे यांनी दिला.
कोणीही मराठ्यांच्या नादाला लागू नये
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे उपसरपंच आहेत. सर्वकारभार तेच हाकतात. परंतु, फडणवीस खूप भित्रे आहेत. मराठ्यांच्या नादाला लागू नका, ओबीसी व मराठा समाजातवाद लावू नका, 32 जणांचा लोकसभेत कार्यक्रम केला. त्यामुळे आता मराठा आमदारांनी देखील सावध होऊन समाजाच्या बाजूने राहावे. जो आमदारविरोधात जाईल त्याचा कार्यक्रम करू,असा इशारा देखील जरांगे यांनी दिला.












Click it and Unblock the Notifications