दौंडमधील यवत गावात तणाव का निर्माण झाला? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले कारण
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या तणावामागे नेमके काय कारण आहे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, "एका बाहेरील व्यक्तीने एका पुजाऱ्यावर बलात्काराचा आरोप करणारे स्टेटस ठेवले. या अफवेमुळे तणाव निर्माण होऊन लोक रस्त्यावर उतरले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला."
सध्या यवतमध्ये शांतता असून, दोन्ही समाजाचे लोक एकत्र बसून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. "जाणीवपूर्वक असा तणाव निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल," असे आश्वासनही त्यांनी दिले.
या घटनेसंदर्भात काही व्हिडिओ समोर आले आहेत. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, "हे व्हिडिओ यवतचे आहेत की बाहेरचे, हे तपासले जाईल. अशा परिस्थितीत बाहेरचे व्हिडिओ दाखवून अफवा पसरवल्या जातात. मी लोकांना शांतता राखण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन करतो."
आमदार राहुल कुल आणि जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
दौंडचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले की, यवतमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून तणावपूर्ण स्थिती होती. प्रशासन शांतता राखण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. "ज्या भागात कधी जातीय तणाव झाला नाही, तिथे अशा घटना घडणे दुर्दैवी आहे. राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्राचे स्वास्थ्य खराब करण्याचे काम सुरू आहे. शांतता निर्माण करण्याऐवजी काही नेते तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत," अशी टीका त्यांनी केली.












Click it and Unblock the Notifications