लोकसभेच्या निकालानंतर मोदी आज पहिल्यांदाच महाराष्ट्रात, बघा काय आहे कारण?
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी पहिल्यांदाच मुंबईत येत आहेत. संध्याकाळी 5:30 च्या सुमारास, पंतप्रधान मोदी मुंबईतील गोरेगाव स्थित नेस्को प्रदर्शन केंद्र येथे पोहोचतील.
या कार्यक्रमात ते 29,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन ,लोकार्पण आणि पायाभरणी करतील. त्यानंतर, संध्याकाळी 7 च्या सुमारास पंतप्रधान मोदी जी -ब्लॉक , वांद्रे कुर्ला संकुल , मुंबई येथे आयएनएस टॉवर्सचे उद्घाटन करतील.

ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाची पायाभरणीही करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16,600 कोटी रुपये खर्चाच्या ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. ठाणे आणि बोरिवली दरम्यान हा दुहेरी ट्यूब बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे. ज्यामुळे बोरिवलीच्या दिशेने पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि ठाणे कडील ठाणे घोडबंदर रोड दरम्यान थेट संपर्क व्यवस्था निर्माण होईल.
प्रकल्पाची एकूण लांबी 11.8 किमी आहे. यामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास 12 किमीने कमी होईल आणि प्रवासाच्या वेळेत सुमारे 1 तासाची बचत होईल.
गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचे भूमिपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी 6300 कोटी रुपये खर्चाच्या गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाची पायाभरणी करणार आहेत. गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग ते मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्ग दरम्यान रस्ता जोडणे ही गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची कल्पना आहे.
गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची एकूण लांबी अंदाजे 6.65 किलोमीटर आहे आणि पश्चिम उपनगरांना नवी मुंबई येथील नवीन प्रस्तावित विमानतळ आणि पुणे मुंबई एक्स्प्रेस वे शी थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ करणार आहेत
नवी मुंबईत कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गती शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलची पायाभरणीही पंतप्रधान मोदी करणार आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाही ते सुरू करतील.
हा एक इंटर्नशिप कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश युवकांना कौशल्य विकास आणि उद्योगाच्या संधी प्रदान करून तरुण बेरोजगारी दूर करणे आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच मुंबई दौरा
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच मुंबईत येत आहेत. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन १२ जुलै रोजी संपले आहे. पंतप्रधान मोदी आज विविध विकास प्रकल्पांच्या पायाभरणीनंतर पश्चिम उपनगरातील नेस्को सेंटर (गोरेगाव) येथे एका सभेला संबोधित करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभेच्या तयारीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला 6 पैकी फक्त 2 जागा जिंकता आल्या.
कडक सुरक्षा व्यवस्था
पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाला ते उपस्थित राहू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ट्रायडेटन हॉटेलच्या आजूबाजूच्या इमारती सुरक्षित केल्या जात आहेत.












Click it and Unblock the Notifications