मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख, विशेष विमानाने पर्यटकांना महाराष्ट्रात आणणार- CM फडणवीसांची मोठी घोषणा
Pahalgam terror attack today in marathi : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या महाराष्ट्रातील एकूण 6 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. यासह या हल्ल्यातील जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मिडिया रिपोर्टनुसार, 26 जणांचा मृत्यू झाला तर सरकारी पातळीवर कालपर्यंत 16 जणांच्या मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांना राज्यसरकार सर्वोतोपरि मदत करत आहे.

पर्यटकांना विशेष विमानाने परत आणणार
राज्य सरकारने घोषणा केली की, महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमानाची व्यवस्था केली जाणार आहे. त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल. तसेच काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी 'राज्य आपत्ती व्यवस्थापन'च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या महाराष्ट्रातील एकूण 6 जणांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली असून जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 23, 2025
महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात…
आपत्तकालीन संपर्क क्रमांक
दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ चोवीस तास कार्यरत आहे.
सहा जणांचे पार्थिव महाराष्ट्रात आणणार
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये मृत्यु झालेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबईत आणण्यात येत आहेत.आज दुपारी श्रीनगर येथून महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील मृतदेह विमानाने मुंबई विमानतळावर येणार आहेत. तेथून हे मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत. राज्य शासन ही व्यवस्था करत आहे.
जारी केले काश्मीरमधील संपर्क क्रमांक
श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात चोवीस तास मदत कक्ष /आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543 या संपर्क क्रमांक तसेच 7006058623, 7780805144, 7780938397 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
मी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो - सीएम फडणवीस
"पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत." अशा शब्दात त्यांनी आपले दुःख व्यक्त केले. तसेच जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत हेही त्यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications