राज्यात माझे केवळ दोन मित्र, एक संजय राऊत अन् दुसरे फडणवीस; जागावाटप वाद, पटोलेंचा मिश्किल टोला
शिवसेना व कॉंग्रेसमध्ये कोणताही वाद नाही, काल चुकीच्या पद्धतीने बातम्या चालल्या आहेत. सकाळी संजय राऊत काय म्हणाले हे तुम्ही सर्व लोकांनी ऐकले आहे. आमच्यात कोणीही मोठा अन् छोटा भाऊ नाही. मुळात माझे दोनच मित्र आहेत, एक संजय राऊत आणि दुसरे देवेंद्र फडणवीस, असे म्हणत नाना पटोले यांनी मिश्किल टोला लगावला.
पटोले-राऊतांमध्ये नेमका वाद काय?
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हे जागावाटपाच्या चर्चेसाठी सक्षम नसल्याचे म्हटले होते. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही थेट पत्रकार परिषदेतूनच पलटवार केला. संजय राऊत हे त्यांच्या पक्षश्रेष्ठींचं अर्थात ठाकरेंचं ऐकत नसतील तर हा त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत पटोले यांनी टोला लगावला होता. त्यावरुन कॉंग्रेस व ठाकरे गटात जागावाटपावरुन वाद निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावर आता राऊत व नाना पटोले यांच्याकडून सारवासारव केली जात आहे. कारण, कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चैन्नीथला यांनी नुकतीच ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर आता नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत म्हणाले की, मी व्यक्तिगतरित्या कोणावरही मतप्रदर्शन केलेले नाही. तेवढी सभ्यता, सुसंस्कृतपणा आमच्यात आहे. प्रत्येक आघाडीत जागा वाटपाचा कुठेतरी अडथळा निर्माण होतो. भाजप - शिवसेना एकत्र होती तेव्हा देखील असे अडथळे होते. काँग्रेस हा एक खूप मोठा पक्ष आहे. आम्ही प्रादेशिक पक्ष आहोत. राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक पक्षांना त्या त्या राज्यात स्थान दिले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. प्रादेशिक पक्षांच्या जोरावरच सध्या राष्ट्रीय राजकारण सुरू आहे. मी यावर आता कुठलेही भाष्य करणार नाही. मी व्यक्तिगत कोणावरही टीका केलेली नाही. माझी भूमिका ही पक्षाची असते. उद्धव ठाकरे यांच्या परवानगीशिवाय मी कधीही काहीही बोलत नाही, असे त्यांनी म्हटले होते.
काय म्हणाले नाना पटोले?
राऊत व पटोले यांच्यात सुरू असलेल्या वादावरुन महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा होऊ लागली आहे. त्यावर आता नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली. मात्र, ही प्रतिक्रिया मिश्किल टोला होता. नाना पटोले म्हणाले की, माझ्यात आणि संजय राऊत यांच्यात वाद नाही. संजय राऊत काय बोलले हे तुम्ही ऐकलं का सकाळी? त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमची अधिकृत भूमिका काही नाही. आम्ही काल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्याच्या संदर्भातल्या बातमीऐवजी ही बातमी पुढे गेली.
नाना पटोले म्हणाले की, आमच्याकडे 30 ते 35 जागांचा अजूनही निर्णय होणे अपेक्षित आहे. प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जागा मागण्यासाठी प्रयत्न करत असतो. मोठा भाऊ, छोटा भाऊ असं काही नाही. महाराष्ट्रात माझे दोनच मित्र आहेत. एक म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि दुसरे संजय राऊत. आमच्यात कोणताही वाद नाही. जागा वाटप अंतिम टप्प्यात आहेत, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications