'अश्या माजुरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही' मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं
नागपूर : कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
कल्याणमधील एका सोसायटीत मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मांडलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कल्याण येथील एका सोसायटीत अखिलेश शुक्ला व त्याच्या पत्नीने भांडणात मराठी माणसाचा अवमान केला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

"शुक्ला हा एमटीडीसी चा कर्मचारी असून त्याला निलंबित करण्याची कारवाई सुरू असल्याचं त्यांनी सांगितले. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, कधी-कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात, माज आणल्यासारखं वागतात. अश्या माजुरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मराठी माणूस कुणाच्या काळात बाहेर गेला? वसई विरारला कोणाच्या काळात मराठी माणूस गेला याचा शोध घ्यायला हवा," असा खोचक टोलाही लगावला.
महाराष्ट्र, मुंबई ही मराठी माणसाची आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने येथे देशभरातील टॅलेंट येथे येत असते, आणि ते येथे शांततेने राहतात. उत्तर प्रदेशातून आलेले अनेक मराठी भाषा उत्तम पणे बोलतात, अनेक मराठी सण साजरे करतात. मात्र, अशा काही लोकांमुळे या सामाजिक सलोख्याला गालबोट लागते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एखाद्याला काय खायचे याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. पण अशा प्रकारे रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही. या आधारावर भेदभाव मान्य नाही. अश्या तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. देशातील वैविध्य टिकले पाहिजे, आपली जबाबदारी आहे. क्षेत्रिय अस्मिता म्हणजे मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यावर घाला घातल्यास सहन करणार नाही, त्याच्यावर कारवाई करणार, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगतिले.












Click it and Unblock the Notifications