मुंबई महापालिकेत भाजपचा ऐतिहासिक 'शंखनाद'; घोषणाबाजीच्या रणधुमाळीत रितू तावडे बनल्या महापौर!
Mumbai BMC 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या २५ वर्षांच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला आहे. गेली अनेक दशके शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई पालिकेवर अखेर भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले असून, रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी अधिकृत निवड झाली आहे. प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन सत्ता पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या हातात आली असली, तरी पहिल्याच दिवशी सभागृहात भाजप आणि ठाकरे गट यांच्यात झालेली घोषणाबाजी राजकीय संघर्षाची नांदी ठरली आहे.

हुतात्म्यांना अभिवादन आणि महायुतीचा धडाका
सत्तारोहणापूर्वी महायुतीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर, शंखनादाच्या जयघोषात हे सर्व नगरसेवक पालिका सभागृहात दाखल झाले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती होती.
'मोदी-मोदी' विरुद्ध 'चोर है': सभागृहात हायव्होल्टेज ड्रामा
सभागृहाचे कामकाज सुरू होताच भाजप नगरसेवकांनी 'जय श्रीराम' आणि 'मोदी-मोदी' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. भाजपचा उत्साह पाहून समोर बसलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी अचानक 'चोर है, चोर है' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, भाजपने वेळीच आपले 'ट्रम्प कार्ड' बाहेर काढले. ठाकरे गटाच्या घोषणांना प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या नगरसेवकांनी 'देवाभाऊ-देवाभाऊ' (देवेंद्र फडणवीस) असा गजर सुरू केला. या नव्या घोषणाबाजीसमोर ठाकरे गटाचा 'चोर है'चा नारा फिका पडला. अखेर ठाकरे गटानेही 'ठाकरे-ठाकरे' अशा घोषणा देत आपली उपस्थिती दर्शवली. गॅलरीत बसलेले देवेंद्र फडणवीस आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम हा संपूर्ण प्रकार शांतपणे निहाळत होते.
अनुभवी 'मराठी चेहरा' मुंबईच्या सेवेत
महापौरपदी विराजमान झालेल्या रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "रितू तावडे या एक अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा आहेत. मुंबईकरांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईला लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन देण्याचे जे वचन आम्ही दिले होते, त्याची पूर्तता आजपासून सुरू झाली आहे."
मुंबई महानगरपालिका २०२६: पक्षनिहाय अंतिम बलाबल
या निवडणुकीत भाजपने ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेतली आहे, तर ठाकरे गटाला ६५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
- पक्ष : जागा
- भारतीय जनता पक्ष (BJP) ८९
- शिवसेना (ठाकरे गट) ६५
- शिवसेना (शिंदे गट) २९
- काँग्रेस २४
- एमआयएम (MIM) ०८
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) ०६
- राष्ट्रवादी काँग्रेस (AP) ०३
- समाजवादी पक्ष ०२
- राष्ट्रवादी काँग्रेस (SP) ०१












Click it and Unblock the Notifications