मुंबईकरांचा प्रवास सुसाट! मेट्रोचे जाळे वाढणार; अंधेरी-चेंबूरसह ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार
Mumbai metro 2026 update : लोकलपाठोपाठ आता मुंबईत मेट्रोही सुसाट असून विकासात मेट्रोने गती मिळवून दिली आहे. लोकलनंतर आता मेट्रोमुळे वाहतुकीची समस्या हळूहळू कमी होत असून मुंबईकरांसाठी एक खास बातमी आहे. मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवरील ट्रॅफिकच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी मुंबईकरांना आता फार काळ वाट पाहावी लागणार नाही. २०२६ हे वर्ष मुंबई आणि ठाणेकरांच्या प्रवासासाठी 'टर्निंग पॉईंट' ठरणार आहे.
वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, मेट्रो २बी, ४ए आणि ७ए या महत्त्वाच्या मार्गांच्या विस्तारामुळे मुंबईची पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान होणार असून, लाखो प्रवाशांचा प्रवास स्वस्त आणि सोयीस्कर होणार आहे.

मेट्रो २बी: पश्चिम उपनगरे आता चेंबूरच्या जवळ
मुंबई मेट्रो मार्ग २बी (अंधेरी पश्चिम ते मानखुर्द) मधील अंधेरी ते डायमंड गार्डन (चेंबूर) हा टप्पा २०२६ च्या अखेरीस कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. २३.६ किमी लांबीच्या या मार्गावर १७ ते १८ स्थानके असतील. विशेषतः लिंक रोड आणि एस.व्ही. रोडवरील वाहनांचा भार या मेट्रोमुळे मोठ्या प्रमाणात हलका होणार आहे. अंधेरी, जोगेश्वरी, मालाड आणि गोरेगाव येथून थेट चेंबूर गाठणे आता मिनिटांच्या अंतरावर येईल.
ठाणेकरांसाठी गेमचेंजर: मेट्रो ४ए
ठाणे आणि मुंबई दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांसाठी मेट्रो ४ए हा सर्वात मोठा दिलासा ठरेल. कॅडबरी जंक्शन ते गायमुख या १०.५ किमी लांबीच्या मार्गावर ९ ते १० स्थानके प्रस्तावित आहेत. मार्च २०२६ पर्यंत हा मार्ग खुला होण्याची अपेक्षा असून, यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या इतिहासजमा होईल. मुलुंड आणि ठाणे परिसरातील प्रवाशांना यामुळे मुंबईच्या मुख्य प्रवाहात येणे अधिक सोपे जाणार आहे.
विमानतळ गाठणे आता सोपे: मार्ग ७ए
मेट्रो ७ए ही सध्याच्या रेड लाईनचा (मार्ग ७) विस्तार असून, ती थेट छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत प्रवाशांना घेऊन जाईल. ३.४ किमीच्या या छोट्या पण महत्त्वपूर्ण मार्गामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील (WEH) वाहतूक कोंडी कमी होईल. विमानतळावर जाण्यासाठी आता टॅक्सीच्या रांगेत किंवा ट्रॅफिकमध्ये तासनतास अडकण्याची गरज भासणार नाही.
प्रदूषण आणि वेळेची बचत
२०२६ मध्ये या तिन्ही मार्गांच्या विस्तारामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाही, तर खाजगी वाहनांचा वापर कमी झाल्यामुळे इंधन आणि प्रदूषणातही मोठी घट होईल. लोकल ट्रेनवरील गर्दीचे विभाजन होऊन मुंबईकरांना एक आलिशान आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होईल.












Click it and Unblock the Notifications