कोर्ट- 3 पर्यंत मैदान रिकामं करा; आंदोलक म्हणतात- गोळ्या घाला हो, तरीही हटणार नाही, मुंबई तापली!
High Court on Manoj Jarange Mumbai March : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात आज (2 सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली.
मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मुंबईतील अस्थिर वातावरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि राज्य सरकारला कडक आदेश दिले. दरम्यान, आता आंदोलक देखील आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा कडक इशारा त्यांनी दिला आहे.
कोर्टाचे ५ महत्त्वाचे निर्देश
१. '३ वाजेपर्यंत मुंबई सुरळीत करा': न्यायालयाने राज्य सरकारला आणि आंदोलकांना स्पष्ट निर्देश दिले की, आज दुपारी ३ वाजेपर्यंत मुंबईतील परिस्थिती सुरळीत करा.
२. सरकारच्या भूमिकेवर नाराजी: न्यायालयाने सरकारच्या आजवरच्या कार्यवाहीवर असंतोष व्यक्त केला.
३. 'कोर्टाला घेराव योग्य नाही': मराठा आंदोलकांनी कोर्टाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही, असेही न्यायालयाने सुनावले.
४. 'परवानगी नाही तर मैदान खाली करा': आंदोलकांकडे आंदोलनाची परवानगी नसेल, तर त्यांनी तात्काळ आझाद मैदान रिकामे करावे. त्यांना सार्वजनिक जागा अडवता येणार नाही.
५. 'कोर्ट स्वतः रस्त्यावर उतरणार': जर दुपारी ३ वाजेपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तर कोर्ट स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेईल, असा इशाराही न्यायालयाने दिला.

आंदोलकांची कोर्टात भूमिका
आंदोलकांनी कोर्टात आपली बाजू मांडताना सांगितले की, "आंदोलकांकडून कोणताही त्रास झाला असल्यास आम्ही माफी मागतो, परंतु प्रशासनाने आंदोलकांसाठी कोणतीही सोय केलेली नाही. ५,००० आंदोलकांना परवानगी दिली, पण ५०० गाड्यांसाठीही पार्किंगची सोय नाही." त्यांनी शांतता राखण्याचे आणि कायद्याचे पालन करण्याचे आश्वासन दिले, तसेच अतिरिक्त गर्दी मीडियामुळे वाढल्याचे सांगितले.
सरकारसाठी कोर्टाचे स्पष्ट आदेश
दक्षिण मुंबई रिकामी करा: दुपारी ३ वाजेपर्यंत दक्षिण मुंबईतील सर्व आंदोलकांना हटवून परिसर रिकामी करण्याचे आदेश.
अवमान केल्यास कारवाई: जर कोर्टाच्या आदेशांचे पालन झाले नाही, तर कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाई केली जाईल.
स्थानिकांना शांततेत राहू द्या: न्यायालयाने सांगितले की, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, ते घराबाहेर पडू शकत नाहीत. त्यांना शांततेत राहू द्या.
आंदोलकांची ठाम भूमिका: 'गोळ्या घातल्या तरी हटणार नाही!'
कोर्टाच्या आदेशानंतरही आझाद मैदानावरील आंदोलकांनी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून एक इंचही हलणार नाही. जोपर्यंत आमचे मनोज दादा इथे बसलेले आहेत, तोपर्यंत मराठा बांधव मुंबईतून हटणार नाही. आम्हाला गोळ्या घातल्या तरीही आम्ही हटणार नाही. आम्हाला आरक्षण द्या, आम्ही आमच्या गावी जातो." आता मनोज जरांगे पाटील यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications