गावांमध्ये लढा, पटेल आक्रमक; ऑपरेशन पोलो अन् निजामाने नांग्या टाकल्या, वाचा-मुक्तीसंग्रामाची कहाणी
Marathwada Mukti Sangram Din : 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण, देशातील 565 पैकी 562 संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील होण्यास तयारी दर्शविली. परंतु, हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. त्यात एक हैदराबाद संस्थानाचा मराठवाड्याशी संबंध येतो.
निजामाच्या भूमिकेमुळे हैदराबाद सह मराठवाड्यातील लोकांना प्रचंड हाल होऊ लागले. जोरदार विरोध होऊ लागला. त्यासाठी मराठवाड्यातील अनेक क्रांतीकारांना प्राणांची आहुती द्यावी लागली. तर दिर्घकाळ लढा चालू राहिला. अखेर स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सैन्य दलाला आदेश दिले अन् ऑपरेशन पोलो सुरू होताच अखेर निजामाने नांग्या टाकल्या. अन् मराठवाडा मुक्त झाला. तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948. त्यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जाऊ लागला. आज 17 सप्टेंबर रोजी जाणून घेऊया या मराठवाडा मुक्तीसंग्रामाची संपूर्ण कहाणी...!
निजामाच्या राजवटीविरोधात लढा उभारला गेला
मुळात देशाला इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून मराठवाडा बराच काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच मराठवाड्याचा हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला. निजामाच्या अन्यायी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ या काळात उभारण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व केले ते स्वामी रामानंद तीर्थ यांनी. हैदराबाद संस्थान मध्ये त्याकाळात तेलंगणा, सध्याचा मराठवाडा आणि कर्नाटक राज्यातील काही भाग येत असे आणि हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या तब्बल 1 कोटी 60 लाख होती.

रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ आदींनी केले नेतृत्व
मराठवाडा मुक्ततेसाठी लढा सुरु असताना रझाकारांचे जनतेवर अत्याचार करणे सुरुच होते. मात्र स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिंगबरराव बिंदू, रविनारायण रेड्डी, भाऊसाहेब वैशंपायन, देवीसिंग चौहान, बाबासाहेब परांजपे, शंकरसिंग नाईक, विजयेंद्र काबरा यासारख्या खंबीर नेतृत्वाखाली हा लढा खेड्यापाड्यात पोहचला अन् लढला गेला.
1938 ते 48 असा दहा वर्ष होता लढा...
1938 ते 1948 हा मराठवाडा मुक्तीसंग्रामचा प्रमुख कालखंड म्हणून ओळखला जातो. याच काळात मराठवाडा निझामाच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी वेगवेगळी राजकीय आंदोलने, विद्यार्थी चळवळी इतकेच नाही तर सशस्त्र आंदोलने देखील झाली. हा विरोध मोडून काढण्यासाठी हैद्राबादच्या निजामाने कासीम रझवी याच्या मदतीने रझाकार संघटनेची स्थापना केली आणि मराठवाड्यातील जनतेवर अत्याचार करायला सुरुवात केली. निजामाने या रझाकार संघटनेचा वापर करुन संस्थानातील नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा निजामाचा स्वतःचे राज्य टिकवण्याचा प्रयत्न होता.
भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण....
15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर मराठवाड्यातील जनतेच्या विरोधाला अणखी चालना मिळाली. यातच निजामाच्या हुकूमशाही राजवटीला उघड उघड आव्हान म्हणून 7 ऑगस्ट रोजी भारतीय संघराज्यात सामील होण्याचा दिवस आणि 15 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. या आव्हानाला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर वेगवेगळे कृती कार्यक्रम हाती घेऊन निजामाच्या सत्तेची पाळेमुळे मोडून काढण्यास खरी सुरूवात झाल्याचे दिसून आले.
सरदार पटेलांची आक्रमक भूमिका...
7 सप्टेंबरला वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या सैन्य दलाला हैद्राबाद संस्थानवर पोलिस बळाचा वापर करण्याचे आदेश दिला. त्यानुसार 13 सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सुरु करण्यात आले. या दरम्यान 17 सप्टेंबरला निजामाने माघार घेतली. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला. हैद्राबाद मुक्ती संग्राम यशस्वी करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला. तो दिवस 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.
संयुक्त महाराष्ट्र निर्मितीत मराठवाड्याचा समावेश
हैद्राबाद विधानसभेत मराठवाड्यातील आमदारांनी केंद्र शासनास हैदराबादचे विभाजन करण्यास भाग पाडले. मराठवाडा सहित स्वतंत्र तेलंगणा व स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचाही डाव उधळुन लावला. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या काळात मराठवाडा भाषिक आधारे महाराष्ट्रात सामील करण्यात आला. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी देखील मराठवाड्यातील जनतेने मोठे योगदान दिले. त्यानंतर 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली












Click it and Unblock the Notifications