‘राज ठाकरे कुचक्या कानाचा, मानाचा भुकेला'; मनोज जरांगेंची मनसे अध्यक्षांवर घणाघाती टीका
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू असून, आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर जरांगे पाटलांनी सडेतोड उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी मराठा मोर्चाच्या प्रश्नांची उत्तरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देऊ शकतील, असे म्हटले होते. यावर जरांगे यांनी जोरदार टीका केली आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील म्हणाले, "राज ठाकरे मानाचे भुकेले आहेत. फडणवीस त्यांच्या घरी चहा पिऊन गेल्यावर त्यांचा पूर्ण पक्ष बरबाद झाला तरी त्यांना चालतो. आमच्या ग्रामीण भागात अशा लोकांना 'कुचक्या कानाचा' म्हणतात."
जरांगे पुढे म्हणाले की, राज ठाकरे मराठ्यांच्या प्रश्नात विनाकारण पडत आहेत. "आम्ही तुम्हाला विचारले का, की तुमचे ११ आमदार निवडून आल्यावर ते पळून का गेले? तुम्ही मराठवाड्यात का आला नाही? नाशिकला ५० वेळा का येता? फडणवीसांनी लोकसभेत तुमचा गेम केला आणि विधानसभेत तुमच्या मुलाला पाडले, तरीही तुम्ही त्यांचीच री ओढता," असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
मनोज जरांगे पाटील यांनी परत मुंबईत येऊन आंदोलन का सुरू केले, याबाबत पत्रकारांनी राज ठाकरेंना विचारले होते. त्यावर राज ठाकरे म्हणाले होते, "मराठा मोर्चा आणि आरक्षणाबद्दलची सर्व उत्तरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मागच्या वेळी त्यांनी नवी मुंबईत प्रश्न सोडवला होता, मग हे पुन्हा का आले, हे त्यांनाच विचारा." या वक्तव्यानंतर जरांगे पाटील यांनी ही टीका केली आहे.












Click it and Unblock the Notifications