मालेगाव अत्याचार प्रकरण ..नाहीतर आरोपीचा एन्काऊंटर करा!' मनोज जरांगे आक्रमक, सरकारला दिला 'हा' इशारा
Manoj Jarange Aggressive On Malegaon rape : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मालेगाव येथील एका निष्पाप, तीन वर्षीय बालिकेवर झालेल्या क्रूर अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणी राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण समाज हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगावजवळ असलेल्या डोंगराळे गावात मृत चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करत प्रशासनाला आव्हान दिले आहे.

जरांगेंच्या यांच्या प्रमुख मागण्या
यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि प्रशासनाकडे अत्यंत कठोर व तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली.
१. जलद न्याय आणि फाशी:
"या प्रकरणात तात्काळ दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे. एका महिन्याच्या आत ही केस लगेच बोर्डावर येऊन जलद निर्णय व्हावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी. असे झाले तरच अशा कृत्यांना आळा बसू शकेल आणि समाजात असे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये दरारा बसेल."
२. उज्वल निकम यांची नियुक्ती करा:
जरांगे यांनी मागणी केली की, "या प्रकरणात उज्वल निकम यांना सरकारी अभियोक्ता म्हणून तातडीने नियुक्त करावे." या संदर्भात ते राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
३. कायद्यात दुरुस्तीची मागणी:
हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून, कायद्यात दुरुस्ती करून आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावी, अशी मागणीही जरांगे यांनी केली.
'एन्काऊंटर करा' - जरांगेंची सरकारकडे मागणी
प्रशासनाला तातडीने कठोर कारवाई करण्याचे आवाहन करताना जरांगे यांनी थेट इशारा दिला. त्यांनी म्हटले की, "जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येत नसेल, तर आरोपीचा एन्काऊंटर करावा लागेल."
बंदचे आवाहन आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान
मनोज जरांगे यांनी नाशिक जिल्ह्यातील समाज बांधवांना मालेगाव बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत, नाशिक जिल्हा बंदची हाक देण्याचे आवाहन केले. जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिले. "जर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कायदा बनवला नाही, संशयित आरोपीला फाशी दिली नाही, सेपरेट बेंच दिला नाही, उज्वल निकम यांची अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली नाही, फास्ट ट्रॅक पद्धतीने केस चालवली नाही किंवा एन्काऊंटर केला नाही, तर पुणे रस्त्यावर पंचानी पाय ठेवू नये."












Click it and Unblock the Notifications