अखेर रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचें कृषी खातं काढलं; जाणून घ्या त्यांची राजकीय कारकीर्द
Manikrao Kokate's agriculture portfolio removed : विधानसभेत ऑनलाईन रमीचा डाव खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी माणिकराव कोकाटेंना चांगलाच दणका दिला आहे. आता कृषिमंत्रीपद माणिकराव कोकाटेंकडून काढले असून अखेर त्यांची गच्छंती झालीच. कोकाटेंचा रमीचा डाव त्यांच्यावरच उलटला असून आता त्यांना फडणवीस सरकारमध्ये चक्क कृषिमंत्री करण्यात आलं आहे.
यासंदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढण्यात आले आहे. माणिकराव कोकाटेंना आता क्रीडा मंत्री करण्यात आलं असून त्यांची राजकीय कारकीर्द आपण जाणून घेऊया.

कोकाटे आता झाले क्रीडा मंत्री!
माणिकराव कोकाटेंचे कृषीमंत्री आता मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तर, मंत्री भरणे यांच्याकडील क्रीडा, युवक कल्याण आणि औकाफ ही खाती माणिकराव कोकाटे यांना देण्यात आली आहेत. त्यामुळे आता कोकाटेंना हे पद देत त्यांची मोठी गच्छंती टाळण्यात आली आहे.

राजीनामा टाळला, एक खातं काढून दुसरं खातं दिलं..
कोकाटे आणि भरणे यांच्या खात्याची अदलाबदल करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्याला दत्तात्रय भरणेंच्या रुपात नवे कृषिमंत्री लाभले आहेत. गुरूवारी रात्री राज्य सरकारकडून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली. विधान परिषद सभागृहात माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटे यांचा राजीनामा घेण्याच्या मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. सोबतच, शेतकऱ्यांसंदर्भातील वादग्रस्त विधानांमुळेही कोकाटे चर्चेत आले होते. अखेर माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते आता मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
हेही वाचा : रमी खेळणारे झाले क्रीडामंत्री! कोण आहे माणिकराव कोकाटे? जाणून घ्या त्यांची अलिकडची वादग्रस्त वक्तव्य
कोकाटेंची राजकीय कारकीर्द
- माणिकराव कोकाटेंनी लहान वयातच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) मधून राजकीय प्रवास सुरू केला. त्यांनी काँग्रेस सोडली आणि १९९९ मध्ये शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) सामील झाले.
- राष्ट्रवादीने त्यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यास नकार दिल्यावर ते शिवसेनेत गेले आणि १९९९ आणि २००४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. नंतर ते तत्कालीन शिवसेना नेते नारायण राणे यांच्या बंडात सामील झाले आणि राणेंसोबत काँग्रेसमध्ये सामील झाले.
- २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर तिसऱ्यांदा सिन्नरमधून विजयी झाले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा भाजपमध्ये सामील झाले आणि शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.
- २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे उमेदवार उदय सांगळे यांच्याविरुद्ध मोठ्या फरकाने कोकाटेंनी विजय मिळवला.












Click it and Unblock the Notifications