मोठी बातमी : विदर्भ-मराठवाड्यातील काही भागात पाऊस! जालन्यात गारपीट, जाणून घ्या कसे राहील हवामान
Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून असलेल्या उन्हाच्या कडाक्यापासून नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. राज्यातील बहुतांश भागात आज पावसाचे आगमन झाले असून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाने कहर केला आहे. तर दुसरीकडे जालना जिल्ह्यात गारपीट झाली आहे.
हवामान विभागाने वातावरणात आगामी चार दिवस मोठे बदल होतील असा अंदाज आधीच वर्तवला होता. त्यातच आता महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचे आगमन झाले असून जालन्यात मात्र गारपीट झाली आहे, गोंदीयात आधीपासूनच सुरु असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जालना जिल्ह्यात गारपीट
जालना शहरासह जिल्ह्यात आज दुपारी तीननंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, जालना शसरासह जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी पाऊस सुरु आहे. काही भागात गोट्यांच्या आकाराच्या गाराही पडल्या आहेत.
आंबा, कांदा, मका पिकाचे नुकसान
आज झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा फळपिकासाह कांदा बियाणे, उन्हाळी बाजरी, मका आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यात गारपीटीमुळे मोठा फटका बसला आहे, या पावसामुळे उन्हाळ्यातील उकड्यातून मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे.

वादळी वाऱ्याने घरांची उडाली छपरे
गोंदीया जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला असून यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे, वादळी वाऱ्यामुळे काही लोकांच्या घरांचे छप्पर उडाल्याचे वृत्त आहे. यादरम्यान गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी आज थेट बांधावर जाऊन शेती पिकांची पाहणी केली तर ज्या गावात लोकांच्या घरांचे छपरे उडाली अश्या घरांची पाहणी करत लवकरात लवकर पंचनामे करून नुकशान भरपाई देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रबी हंगामात धान पिकांची लागवड केली होती मात्र अवकाळी पाऊसामुळे तोंडी आलेला घास देखील हिरावला गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून लवकरात लवकर शेतीचे पंचनामे पूर्ण करून नुकसानन भरपाई दिली जाईल अशी स्थानिक प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे.
११ मे पर्यंत पावसाचा अंदाज
महाराष्ट्रात ११ मे पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज तापमानात घट दिसून आली असून अकरा मेपर्यंत तापमानात घट दिसून येईल. तर गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला, तर कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे होते. कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
गेल्या २४ तासांत प्रमुख शहरांमधील तापमान (अंश सेल्सिअसनुसार)
मुंबई (कुलाबा) ३४.१, सांताक्रूझ ३३.७, अलिबाग, रत्नागिरी ३४.२. पणजी (गोवा) ३६.१. डहाणू ३५.८. पुणे ३६.९, लोहगाव ३९.८. अहिल्यानगर जळगाव ३९.०, कोल्हापूर ३६.२, महाबळेश्वर ३०.७, मालेगाव ४२.४. नाशिक ३५.७. सांगली ३७.९. सातारा ३७.७ सोलापूर ४०.६, धाराशिव छत्रपती संभाजीनगर ३९.०, परभणी ४१.७, नांदेड, बीड, अकोला ४१.६, अमरावती ३७.६. बुलढाणा ३९.०, ब्रह्मपुरी ४०.०, चंद्रपूर ४०.८, गोंदिया ३७.१, नागपूर ३९.६, वाशिम ४२.८. वर्धा ३९.९, यवतमाळ ४०.००












Click it and Unblock the Notifications