सावधान..! 'या' गावात गेलाय उष्माघाताचा पहिला बळी; 11 वर्षीय विद्यार्थ्यासोबत घडले असे काही...
राज्यात सध्या ४० अंश सेल्सिअरच्या पुढे तापमान गेले आहे. अनेक जिल्ह्यांत तर उन्हाचा पारा ४५ अंशाच्या पुढे गेला आहे. आज बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला. संस्कार सोनटक्के या 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. शेगावच्या संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये तो शिक्षण घेत होता. विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नेमके काय झाले?
संस्कार सोनटक्के हा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये शिकत होता. तो इयत्ता सहावीत होता. संस्कारला उन्हाचा त्रास झाल्याने त्याची तब्येत बिघडली. यानंतर त्याला उपचारासाठी अकोल्यातील रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात उष्मघाताचा पहिला बळी गेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून त्याचा थेट फटका हा शाळकरी विद्यार्थ्यांना बसला आहे
मालेगावात उष्णतेचा कहर
मालेगाव शहर आणि तालुक्यातही उष्णतेची लाट पसरली आहे. मालेगावातील तापमानाने ४३.२ अंशांचा आकडा पार केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही आठवडे अधिक उष्णता जाणवणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांना उष्माघाताचा त्रास झाल्यास तातडीने उपचार मिळावेत यासाठी मालेगाव सामान्य रुग्णालयात १० खाटांचा उष्माघात कक्ष तयार करण्यात आला आहे. लहान मुलांसाठी ५ आणि मोठ्यांसाठी आयसीयूमध्ये ५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. योगेश पाटील यांनी दिली.
अनेक जिल्ह्यात उष्माघाताचे कक्ष
धुळे जिल्ह्यातही तापमानात वाढ होत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. इतर जिल्ह्यातही आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली आहे. सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे दुपारी बारा ते चार या वेळेत बाहेर पडणे टाळावे असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.












Click it and Unblock the Notifications