पुढील 24 तास महत्त्वाचे, सात जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा धोका; हवामान विभागाचा इशारा
राज्यभरात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, सिंधुदुर्गपासून गोंदियापर्यंतच्या सात जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे. मागील दोन दिवसांत अनेक ठिकाणी रस्ते बंद, दरड कोसळण्याच्या घटना आणि घरांत पाणी शिरल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनीही तयारी वाढवली आहे.

कोकणात पावसाचा कहर सुरूच
कोकण विभागात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. 17 ते 20 जून दरम्यान या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई आणि ठाणे येथे 17 जूनला मध्यम स्वरूपाचा पाऊस तर 18 जूनला काही भागांत जोरदार सरी कोसळू शकतात. 19 आणि 20 तारखेला पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
घाटमाथ्यांवर वाऱ्यांसह प्रचंड पाऊस
पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यांमध्येही 17 ते 20 जूनदरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी दरड कोसळण्याची आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पुणे शहर व मैदानी भागांत मात्र पावसाचे प्रमाण तुलनेने मध्यम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात संमिश्र परिस्थिती
नाशिक आणि अहमदनगर (अहिल्यानगर) या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस 17 जूनला पडेल, तर नंतरच्या दिवसांत केवळ तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे. सांगली व सोलापूर येथेही 17 ते 20 जून दरम्यान हलक्याच स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रात वीजांचा कडकडाट कायम
धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये 17 ते 20 जून दरम्यान विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह वाऱ्यांचा वेगही काही प्रमाणात जाणवेल.
मराठवाड्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये 17 ते 20 जून दरम्यान हलका ते मध्यम पाऊस होईल. 20 तारखेला विशेषतः परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भात विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस सुरू आहे. 17 जून रोजी अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि नागपूर येथे जोरदार पावसाचा इशारा आहे. या भागात ३० ते ५० किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, नागरिकांनी दक्षता घ्यावी.
18 ते 20 जूनदरम्यान या जिल्ह्यांत पावसाचा जोर थोडा कमी होईल, मात्र वीजांचा कडकडाट आणि गडगडाट कायम राहील. अकोला, वाशीम, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याचा अंदाज आहे, तरीही हलक्याफुलक्या सरी व मेघगर्जना अनुभवायला मिळतील.
एकूण परिस्थिती : संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय
राज्यात मान्सूनचे आगमन प्रभावीपणे झाले असून अनेक भागांत वातावरण ढगाळ असून, ठिकठिकाणी पावसाचे प्रमाण वाढले आहे. शहरांतील नागरिकांनी हवामानाच्या अंदाजानुसार गरजेची खबरदारी घेऊनच बाहेर पडावे, तसेच शक्य असल्यास अनावश्यक प्रवास टाळावा. रस्त्यांची स्थिती, विजेच्या लाईन्स, ओढे आणि नाल्यांची पातळी यावर प्रशासनाने लक्ष ठेवले आहे.












Click it and Unblock the Notifications