जे घडलं, त्याला फक्त न्या. चंद्रचूड जबाबदार; वाचा नेमका काय आहे संजय राऊतांचा आरोप
Sanjay Raut's Allegation- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने पुन्हा गड राखला. गेल्यावेळीपेक्षा चांगला स्ट्राईक रेट ठेवत यंदा महायुतीने एकहाती विजय मिळवला. महायुतीच्या त्सुनामीसमोर महाविकास आघाडीच्या अनेक मोठमोठ्या नेत्यांचे गड ढासाळले. कालच्या या निकालावर आज शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली. हा विजय जनतेच्या मनातला नाही, असं म्हणत त्यांनी या विजयावर आक्षेप नोंदवला.

काय म्हणाले संजय राऊत ?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत म्हणाले, हा निकाल जनतेच्या मनातला विजय नाही. पहिल्या दोन तासांत चाललेली बरोबरीची लढाई अचानक कशी बदलते..? पुढच्या दोन तासांत जे निकाल लागले ते संशयास्पद आहेत. सरकार विरोधात सगळीकडे वातावरण असताना, हे यश कसं मिळालं, हा संशोधनाचा विषय आहे. लोकशाहीत असं होत नाही. हा निकाल आधीच ठरवलेला होता. आपल्याला फक्त मतदान करु दिलं. हे सगळं संशयास्पद आहे.
न्या. चंद्रचूड यांच्यावर केला आरोप
महाराष्ट्रातील आजच्या निकालाला खा. संजय राऊत यांनी न्या. धनंजय चंद्रचूड यांना जबाबदार धरलं. ते म्हणाले, राज्यातील या सगळ्याला जबाबदार कोण असेल, तर ते सर न्यायधीश डी. वाय चंद्रचूड... देशाचं सर्वोच्च न्यायालय आहे. त्या न्यायालयाने आमदार अपात्रतेच्या संदर्भात वेळेत निर्णय द्यायला हवा होता. पण अडीच वर्षे निर्णय झाला नाही. मग अडीच वर्षे निर्णय होत नसेल तर मग तुम्ही खुर्चा कशाला उबवताय? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
इतिहास माफ करणार नाही
राऊत म्हणाले, धनंजय चंद्रचूड हे बाहेर भाषणं द्यायला चांगले आहेत. मात्र सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक पद्धतीने निर्णय दिला नाही. यासाठी इतिहास त्यांना माफ करणार नाही. चंद्रचूड यांनी योग्य निकाल दिला असता, तर महाराष्ट्रातलं चित्र बदललं असतं. चंद्रचूड यांनी निर्णय न दिल्याने पक्षांतराच्या खिडक्या ते उघड्या ठेवून गेले. आत्ताही कुणीही कुठेही कशाही उड्या मारु शकेल, आमदार विकत घेऊ शकेल. कारण दहाव्या सूचीची भीतीच राहिली नाही. न्यायमूर्तींनीच ती भीती घालवली. जी काही दुर्घटना महाराष्ट्रात झाली त्याला जस्टिस चंद्रचूड जबाबदार आहेत. इतिहासात त्यांचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिलं जाईल.
मुख्यमंत्री गुजरात लॉबी ठरवेल
मुख्यमंत्रीपदाबाबतही संजय राऊत यांनी मोठं विधान केलं. ते म्हणाले, महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार ते गुजरात लॉबी ठरवेल. महाराष्ट्राऐवजी गुजरातला शपथविधी सोहळा घेतला तर त्यांच्या लोकांना आनंद होईल. शिवतीर्थावर शपथविधी सोहळा झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल. तसंच वानखेडे स्टेडियमवर शपथविधी झाला तर तो महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान होईल. हे सरकार गुजरात लॉबीला हवं होतं, त्यामुळे आणण्यात आलं आहे आणि लादण्यात आलं आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.












Click it and Unblock the Notifications