महिला, शेतकरी आणि ज्येष्ठांनाही केलं खूश; महायुतीचा दिवाळीनंतर सुखद धक्का
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने आजपासून प्रचाराचा शुभारंभ केला. कोल्हापूरमधील जाहीर सभेतून 'केलंय काम भारी आता पुढची तयारी' अशा टॅगलाईनखाली जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून दीड हजारांवरून वाढवून 2100 केले जातील, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, वृद्धांना पेन्शन तसेच शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढविण्याबाबतची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
ज्या 10 घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या त्यात ज्येष्ठ नागरिकांचे मासिक निवृत्तीवेतन हे 1,500 रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत वाढवून त्यांच्या नंतरच्या वर्षांत आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल, असे सरकारने जाहीर केले. यामुळे राज्यातील सुमारे 40 ते 50 लाख ज्येष्ठांना दिलासा मिळणार आहे.

सरकारचे ज्येष्ठांकडे लक्ष
महाराष्ट्र सरकारने यापूर्वीही ज्येष्ठ नागरीकांसाठी विविध योजना राबवविलेल्या आहेत. ज्येष्ठ नागरीकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून राज्य सरकार ज्येष्ठ नागरीकांना तीन हजारांची आर्थिक मदत देतं. अर्जदाराच्या थेट बँक खात्यात ही रक्कम हस्तांतरीत होत असल्याने या योजनेचा राज्यातील सुमारे दीड लाख ज्येष्ठांना लाभ झालेला आहे.
सरकारने वृद्धाश्रम योजनाही चालवली
अनाथ, निराधार, निराश्रीत ज्येष्ठांचे जीवन जगणे सुकर व्हावे यासाठी सरकारने त्यांना हक्काचा निवारा देण्यासाठी वृद्धाश्रम योजना सुरु केली. स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत हे वृद्धाश्रम चालविले जातात. त्यात प्रत्येक व्यक्तीमागे 900 रुपये मानधन दिले जाते. शिवाय त्यांचे अन्न,वस्त्र,निवारा व औषधोपचाराचा खर्चही भागविला जातो. या शिवाय महायुती सरकार मातोश्री वृद्धाश्रम योजनाही चालवते.शिवाय या वृद्धाश्रमात बाग-बगिचा, टीव्ही, खेळ आदींची सोयही केली जाते. शासनाने सुमारे 31 जिल्ह्यात असे वृद्धाश्रम सुरु केले असून त्यातील सुमारे 23 वृद्धाश्रम सुरु आहेत.
श्रावणबाळ योजनेलाही प्रतिसाद
राज्यातील 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना थेट पैसा देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. त्यातून वृद्धांना प्रतिमाह 600 रुपये देण्यात येतात. शिवाय राज्यातील ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवासाची सुविधाही देण्यात आली आहे. संजय गांधी निराधार योजनाही सरकारने सुरु केली आहे. राज्यात सुमारे एक कोटी ज्येष्ठ नागरिक असल्याचे सरकारी आकडेवारीवरुन दिसते. त्यापैकी सुमारे 80 टक्के वृद्धांना या योजनांच्या माध्यमातून लाभ दिला जात आहे.
वृद्ध पेन्शन योजनेत वाढ
सोमवारी महायुती सरकारने त्यांचा निवडणूक जाहिरनामा प्रसिद्ध केला.त्यात वृद्धांना दरमहा 1500 रुपये मिळणारी पेन्शनची रक्कम वाढविली जाण्याची घोषणा करण्यात आली. आता महायुती सरकार वृद्धाने 2100 रुपये पेन्शन देणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील वृद्धांना त्यांच्या औषधोपचार किंवा इतर गरजांसाठी करता येणार आहे. या योजनेचे लाखो लाभार्थी आहेत. या लाखो लाभार्थ्यांचा विचार महायुती सरकार करणार आहे. पेन्शनमध्ये एकरकमी 600 रुपये वाढ होणार असल्याने या घोषणेचे सर्व स्थरांतून स्वागत होत आहे.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेलाही प्रतिसाद
महायुती सरकारने यापूर्वी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणली. या योजनेद्वारे ज्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा आहे, पण काही कारणांनी त्यांना ही इच्छा पूर्ण करता आलेली नाही, त्या ज्येष्ठ नागरिकांची इच्छा आता शासन पूर्ण करणार आहे. राज्यातील सर्वधर्मीय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रति व्यक्ती 30 हजार रुपये इतके अनुदान प्रवास खर्चासाठी देण्यात येणार आहे. या योजनेलाही महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला.












Click it and Unblock the Notifications