आमचा जोड, फेविकाँलचा जोड..! जागावाटपावरुन मविआत कोणताही वाद नाही, वडेट्टीवारांचा दावा
राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उद्यापासून उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. मात्र, अद्यापही महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम झालं नसून काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटात वादाची ठिणगी पडलेली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील मतभेदही भर पत्रकारपरिषदेतून समोर आले होते. त्यावर आता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
काँग्रेसने फेटाळल्या स्वबळाच्या चर्चा
ठाकरे गट व काँग्रेसमध्ये काही जागांवरुन घमासान सुरु आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून नाना पटोले व संजय राऊत यांच्यातील वाद थेट प्रसारमाध्यमांसमोर उघडकीस आला होता. त्यानंतर, काँग्रेसचे वरिष्ठ नेते व प्रभारी रमेश चेनीथला यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन जागावाटपावर चर्चा केली होती. मात्र, अद्यापही शिवसेना व काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा कायम आहे. त्यातच, आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू असल्याचे वृत्त माध्यमांत झळकले. मात्र काँग्रेसच्याच नेत्यांनी हे वृत्त फेटाळले आहे. ती बातमी पेरण्यात आलीय, आमच्या भांडणं लावण्याचा हा प्रयत्न असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

वडेट्टीवारांनी फेटाळले वादाचे विषय
उद्धव ठाकरेंच्या आक्रमकतेमुळे काँग्रेसनेही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात आहे. तसेच, महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा कायम असून शिवसेना ठाकरे गटाकडून स्वबळाचा नारा देण्यात येत आहे. ठाकरे गट आता महाराष्ट्रात 288 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली होती. विशेष म्हणजे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली असून दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संजय राऊत यांच्यातही दिल्लीत चर्चा झाल्याचा दावा काँग्रेसमधील काही नेत्यांनी केला होता. उद्धव ठाकरेंकडून कालच्या भेटीनंतरच स्वबळाची तयारी सुरू करण्यात आल्याचं दिसून आलं, असं काँग्रेसमधील सुत्रांनी म्हटलंय. मात्र, काँग्रेसने हे वृत्त फेटाळले असून या दाव्यात कुठलंही तथ्य नाही, असं वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं.
नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार
काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांच्या पश्नाला उत्तर देताना हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. ही बातमी पेरण्यात आली असून त्या बातमीत एक टक्काही सत्य नाही, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात तणाव वाढविण्यासाठी भाजपकडूनच अशा बातम्या पेरण्यात आल्या आहेत, असं वडेट्टीवारांनी म्हटलंय. मविआतील तिन्ही पक्षांचा फेव्हीकॉलचा मजबूत जोड आहे, असं स्पष्टीकरण वडेट्टीवारांनी दिलं.












Click it and Unblock the Notifications