अजित पवारांना पैसा कमवायचायं, राजकारण सोडून व्यवसाय करा; लक्ष्मण हाकेंचा टोला
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. "अजित पवार यांना ना आचारधर्माचं भान आहे ना सत्तेतील विचारधारा महत्त्वाची वाटते.

त्यांच्या राजकारणामागे केवळ एकच हेतू आहे - पैसा कमवणे," असा घणाघात हाकेंनी केला. एवढंच नव्हे, तर "अशा व्यक्तींनी राजकारणात राहण्यापेक्षा एखादा व्यवसाय सुरू करावा," असा टोला त्यांनी लगावला.
हाके परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाच्या भेटीदरम्यान बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवारांवर अनेक गंभीर आरोप केले.
"त्यांचा पक्ष म्हणजे निव्वळ सरंजामी वृत्तीचा पक्ष आहे. ओबीसी समाजाच्या हितासाठी काहीही न करता त्यांनी हजारो कोटींचा निधी वाटला, पण ओबीसी वसतिगृहांसाठी एक रुपयाही खर्च केला नाही," अशी टीका त्यांनी केली.
हाके यांनी अजित पवारांच्या सामाजिक न्यायाविषयीच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "महाज्योतीसारख्या संस्थांसाठी सुद्धा त्यांनी काही निधी दिला नाही. त्यामुळे सामाजिक न्याय आणि अजित पवार हे एकमेकांपासून दूरच राहिलेले विषय आहेत," असे ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांत हाके यांनी वारंवार अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी म्हटलं होतं, "अजित पवार हे आजही शरद पवार यांच्या 'रिचार्ज'वरच राजकारण करत आहेत. आता त्यांच्या पंखांना बळ मिळालंय, पण विचार आणि धोरण यांचा अभाव आहे."
त्याचबरोबर पार्थ पवारांवरही टीका करत हाके म्हणाले होते, "पार्थ पवारांना लोकांनी निवडणुकीत नाकारलं. त्यांनी पुन्हा राजकारणात पाऊल ठेवलं तरी जनतेनं त्यांना स्वीकारलं नाही. त्यांच्या पराभवातूनच त्यांची योग्यता कळते."
या घणाघाती टीकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications