Ladki bahin yojana : लाडक्या बहिणींनो योजनेचे पैसे थांबू शकतात? 'E-Kyc' साठी उरले 'एवढे' दिवस!
Ladki bahin yojana e kyc deadline : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेणाऱ्या कोट्यवधी महिलांसाठी एक महत्त्वाची आणि तातडीची बातमी आहे. या योजनेचा हप्ता अखंडपणे मिळवण्यासाठी 'E-Kyc' प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत सर्व लाभार्थ्यांना इशारा दिला आहे की, ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. आता केवळ शेवटचे ४ दिवस उरले असून, ज्या महिलांची ई-केवायसी अपूर्ण असेल, त्यांचा पुढील लाभ धोक्यात येऊ शकतो.

काय म्हणाल्या मंत्री आदिती तटकरे?
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करुन लाडक्या बहिणींना आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, "लाडक्या बहिणींनो.. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी E-Kyc प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख असून, आता केवळ शेवटचे ४ दिवस उरले आहेत. सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली E-Kyc प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती !"
लाडक्या बहिणींनो...
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) December 27, 2025
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी E-Kyc प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख असून, आता केवळ शेवटचे ४ दिवस उरले आहेत.
सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली E-Kyc प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र… pic.twitter.com/LMxMlLqlsV
E-Kyc प्रक्रिया कशी पूर्ण करावी? (सविस्तर माहिती)
तुमचा योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने ई-केवायसी पूर्ण करता येईल.
१. 'नारी शक्ती दूत' ॲपद्वारे (घरबसल्या):
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील 'Nari Shakti Doot' ॲप अपडेट करा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉग-इन करा.
- 'ई-केवायसी' (E-Kyc) या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा आधार नंबर टाकून आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा.
- चेहरा पडताळणी (Face Verification) किंवा अंगठ्याचा ठसा विचारल्यास ती प्रक्रिया पूर्ण करा.
२. महा-ई-सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रावर जाऊन
- जर तुम्हाला मोबाईलवर प्रक्रिया करणे कठीण जात असेल, तर जवळच्या सीएससी (CSC) सेंटर किंवा महा-ई-सेवा केंद्रावर जा.
- सोबत आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर घेऊन जा.
- तिथे बायोमेट्रिक (अंगठ्याचा ठसा) देऊन तुमची ई-केवायसी त्वरित पूर्ण होईल.
३. अंगणवाडी सेविकांच्या मदतीने:
ग्रामीण भागात तुम्ही तुमच्या स्थानिक अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधूनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
३१ डिसेंबरनंतर काय होईल?
शासनाच्या नियमानुसार, ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार नाही, त्यांचे नाव 'अपात्र' किंवा 'प्रलंबित' यादीत जाऊ शकते. त्यामुळे जानेवारी २०२६ चा हप्ता मिळण्यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात. म्हणूनच, आदिती तटकरे यांनी आजच ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.












Click it and Unblock the Notifications