जिल्हा हादरला ! ठाकरे गटाच्या नेत्याची आत्महत्या, कारण काय?
शहराच्या राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगाव महानगरपालिकेतील शिवसेना (ठाकरे गट) नगरसेवक अनंत जोशी यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. ओंकारेश्वर मंदिर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

अनंत जोशी हे जळगाव महापालिकेत ठाकरे गटाचे नगरसेवक आणि गटनेते म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमुळे जळगावाच्या राजकारणात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 21 जुलै रोजीच त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. जोशी यांच्या निधनाची बातमी कळताच, शिवसेना ठाकरे गटाचे नेते, कार्यकर्ते आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे.
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला होता, मात्र अनंत जोशी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले होते. पण अलिकडच्या काळात ते पक्षात फारसे सक्रिय नव्हते, अशीही माहिती समोर येत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन लढ्ढा यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "गेल्या काही दिवसांपासून अनंत जोशी काहीतरी विवंचनेत होते. पण त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय का घेतला, हे कळले नाही." जोशी यांच्या आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.












Click it and Unblock the Notifications