'तुझ्यात दम असेल तर निवडणूक रोखून दाखव!': गुणरत्न सदावर्तेंची राज ठाकरेंवर एकेरी भाषेत बोचरी टीका
Gunratna Sadavarte challenges Raj Thackeray : राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतचोरीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीसह सर्वपक्षीय विरोधकांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे आणि याच मुद्द्यावर १ नोव्हेंबर रोजी मुंबईत एका सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात मनसेप्रमुख राज ठाकरे हे देखील सहभागी होणार असल्याने, वकील आणि राजकीय भाष्यकार ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंसह विरोधकांवर कडाडून टीका केली आहे.

विरोधकांच्या मोर्चावर 'ढोंग्याचा' हल्ला
गुणरत्न सदावर्ते यांनी महाविकास आघाडी आणि सर्वपक्षीय विरोधकांनी काढलेल्या मोर्चाची वैधता आणि हेतू यावर थेट प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांनी या मोर्चाला 'सत्याचा नव्हे, तर ढोंग्याचा मोर्चा' आणि 'लबाडांचा मोर्चा' असे संबोधले. सदावर्ते म्हणाले, "मी तुम्हाला सांगतो, देशात कायद्याचे राज्य आहे. राज, उद्धव, शरद पवार म्हणतात म्हणून कोणतेही गलत काम मुंबईत चालणार नाही."
त्यांनी स्पष्ट केले की, इतरांना जसे कायदे लागू होतात, त्याच नियमांचे पालन राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या मोर्चाला देखील करावे लागेल.
उच्च न्यायालयाने विरोधकांना मोर्चा काढण्यासाठी आझाद मैदान हे ठिकाण निश्चित करून दिले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दुसरीकडे मोर्चा काढता येणार नाही, असेही सदावर्ते यांनी ठणकावले.
'राज ठाकऱ्या, तुझ्यात दम असेल तर चुनांव रोक के दिखाव!'
या संपूर्ण वादाला धार तेव्हा आली, जेव्हा गुणरत्न सदावर्ते यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना त्यांच्या एका विधानावरून थेट आव्हान दिले. राज ठाकरे यांनी यापूर्वी म्हटले होते की, जोपर्यंत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त होत नाही आणि हा घोळ मिटत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही.
राज ठाकरेंच्या या वक्तव्याचा संदर्भ घेत सदावर्ते यांनी त्यांना एकेरी भाषेत डिवचले आणि पलटवार केला. ते म्हणाले की, "राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव. त्यांनी पुढे म्हटले की, "हे दळभद्री उद्या मरणार म्हणून आज गौऱ्या रचत आहेत." त्यांनी हा मोर्चा नियमात असेल तरच परवानगी द्यावी, अन्यथा नाही, अशी मागणी केली.
सदावर्ते यांची ठाकरे-पवारांवर बोचरी टीका
गुणरत्न सदावर्ते यांनी केवळ राज ठाकरेंवरच नव्हे, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही बोचरी टीका केली. "उद्धव ठाकरेंचा संजूबाबा (संजय राऊत) म्हणाला की बोलून वळवता येत नसते, सुप्रीम कोर्टाची केस तिकडे वळवू असे म्हणतो." सदावर्ते म्हणाले की, विरोधकांमध्ये निवडणूक लढायची ताकद नाही, म्हणूनच ते हे सर्व करत आहेत.
"शरद पवार कृषीमंत्री होते, मुख्यमंत्री होते, त्यांना या वयात हे उलगडू नये?" असे म्हणत त्यांनी पवारांच्या राजकीय अनुभवावर प्रश्नचिन्ह उभे केले.
सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे यांना 'सुमार दर्जाचा व्यंगचित्रकार' आणि 'नालायक' असे संबोधले आणि जनतेला या मोर्चाला पाठ फिरवण्याचे आवाहन केले.
यापूर्वी जरांगे यांच्या मोर्चाच्या वेळी न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले होते की मोर्चा ठरवून दिलेल्या जागीच केला पाहिजे, याचा संदर्भ देत सदावर्ते यांनी इशारा दिला की, "ते जर जास्त डुर डुर करू लागले, तर त्यांच्या मुसक्या आवळा."












Click it and Unblock the Notifications