VIDEO : गोरेगाव फिल्मसिटीतील 'अनुपमा' मालिकेच्या सेटवर भीषण आग;नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न
मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देशभरात प्रचंड लोकप्रिय असलेल्या हिंदी मालिकेची, 'अनुपमा' ची शूटिंगसाठी सज्ज केलेली सेटिंग आज पहाटेच्या सुमारास भीषण आगीत भस्मसात झाली. ही दुर्घटना पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली असून, सकाळी ७ वाजता शूटिंग सुरू होणार होते. नियोजित वेळेच्या अवघ्या दोन तास आधी लागलेली आग, मोठ्या अनर्थास कारणीभूत ठरू शकली असती.

सेट पूर्णपणे जळून खाक; मोठी दुर्घटना टळली
आग लागली त्यावेळी सेटवर काम करणारे कर्मचारी आणि काही तंत्रज्ञ उपस्थित होते. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रारंभिक माहितीनुसार, ही आग सेटवर लावण्यात आलेल्या विजेच्या वायरिंगमुळे किंवा काही तांत्रिक बिघाडामुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Massive Fire Breaks Out on the Set of ‘Anupamaa’ in Mumbai’s Film City – AICWA Demands High-Level Investigation and Accountability
— All Indian Cine Workers Association (@AICWAOfficial) June 23, 2025
Mumbai, 23rd June 2025 – A major fire broke out early this morning at 5:00 AM on the set of the popular television serial Anupamaa in Film City,… pic.twitter.com/KjxXGyM9mn
शेजारील सेट वाचले थोडक्यात
'अनुपमा'चा सेट जळून खाक झाला असला, तरी शेजारील इतर मालिकांचे सेट मात्र आगीपासून थोडक्यात बचावले आहेत. जर ही आग वेळीच आटोक्यात आणली नसती, तर संपुर्ण फिल्मसिटीला तिचा फटका बसण्याची शक्यता होती.
सेटवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा सेटवरील सुरक्षा व्यवस्था आणि फायर सेफ्टी प्रोटोकॉलवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मागील काही वर्षांत फिल्मसिटीमध्ये अनेकदा अशा प्रकारच्या आगी लागण्याच्या घटना घडल्या असून, त्यावर उपाययोजना करण्याऐवजी संबंधित प्रॉडक्शन हाऊसेस आणि व्यवस्थापनाकडून केवळ तात्पुरत्या सुधारणा करण्यात येत असल्याची टीका केली जात आहे.
कामगारांच्या जीवावर उठलेले काम
या प्रकारांमुळे सेटवर काम करणारे शेकडो तंत्रज्ञ, कलावंत आणि मजूर रोजच्या रोज जीव मुठीत घेऊन काम करत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. आग ज्या वेळी लागली, त्या वेळी केवळ सेटिंगची तयारी सुरू होती. मात्र, शूटिंग वेळेनुसार कलाकार आणि मुख्य क्रू पोहोचले असते, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता आली नसती.
'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक झाला असला, तरी सुदैवाने एक मोठा अनर्थ टळला आहे. तथापि, यासारख्या घटनांनी पुन्हा एकदा सेटवरील सुरक्षितता, प्रशासनाची दक्षता आणि प्रॉडक्शन हाऊसेसच्या जबाबदारीची गरज अधोरेखित केली आहे. आता तरी संबंधित यंत्रणांनी कठोर पावले उचलून अशा दुर्घटना टाळण्याची आवश्यक तयारी करावी, हीच अपेक्षा आहे.












Click it and Unblock the Notifications