गुड न्यूज! 'गणपती'साठी कोकणात एसटीच्या 5 हजार बसेस धावणार! महिला-ज्येष्ठांना सवलत, आरक्षण कसं करायचं
Ganpati Festival 5,000 buses will run from Mumbai to Konkan : लाडक्या बप्पांच्या आगमानाची चाहुल आतापासूनच लागली असून एसटी महामंडळ आषाढी एकादशीनंतर जेव्हा जादा बसगाड्यांचे नियोजन करते तेव्हा गणपतीबप्पा येणार हेही समजते. कारण असंख्य गणेशभक्तांना मुंबईतून कोकणात नेणारी एसटी आणि बप्पांचं एक आगळवेगळं नातं आहे. म्हणूनच एसटी महामंडळ या कार्यासाठी झपाटून सरसावते.
मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने एक खूशखबर दिली आहे. यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

काय म्हणाले मंत्री सरनाईक?
मंत्री सरनाईक म्हणाले की, गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफ्या -तोट्याचा विचार न करता एसटी धावत असते. यंदा सुमार ५००० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील.
कुठे करायचे आरक्षण?
बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे, उपलब्ध होणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी देखील एसटी महामंडळाने ५२०० जादा बसेस सोडल्या होत्या. त्याला भाविक - प्रवाश्यांचा अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे गणपती उत्सवासाठी देखील एसटीने तब्बल ५००० जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे.
२२ जुलै पासून गट आरक्षणाला सुरुवात
जादा बसेस मध्ये व्यक्तिगत आरक्षणा बरोबरच गट आरक्षणासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे. गट आरक्षण २२ जुलै पासून सुरू होत आहे. २३ ऑगस्ट पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी ४३०० बसेस सोडण्यात आल्या होत्या.
कधी होणार गणरायाचं आगमन?
महाराष्ट्रात गणेश उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असतो. अशा स्थितीत मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणरायाचे आगमन होत आहे, बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. एसटीने यासाठी जादा बसेसचे नियोजन केले आहे.












Click it and Unblock the Notifications