शिवसेनेच्या खासदारांशी एकनाथ शिंदे यांची चर्चा
Mumbai: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या सर्व नवनियुक्त खासदारांसाठी आज वर्षा निवासस्थानी विशेष स्नेहभोजन आणि बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार प्रतापराव जाधव, खासदार संदीपान भुमरे, खासदार धैर्यशील माने, खासदार रवींद्र वायकर, खासदार श्रीरंग बारणे हे नवनिर्वाचित खासदार उपस्थित होते.
तर माजी खासदार संजय मंडलिक, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, आमदार संजय शिरसाट, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, सचिव संजय मोरे देखील उपस्थित होते. बुलढाणा, संभाजीनगर, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम, मावळ, हातकणंगले अशा सात ठिकाणी हे खासदार निवडून आले आहेत.

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व खासदारांना सन्मानित केले तर स्नुषा सौ.वृषाली शिंदे यांनी या सर्व खासदारांचे औक्षण केले. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सर्व खासदारांशी संवाद साधला. निवडून आलेल्या सर्व सात खासदारांचे निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.
निवडणुकीत नक्की कुठे कमी पडलो याचाही आढावा घेतला. ईंडी आघाडीच्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात राहू नका, अशा सूचनाही शिंदे यांनी खासदारांना दिल्याचे समजते.
शिंदेंचे राजकीय वजन वाढले
दरम्यान कमी जागा मिळूनही अधिक ठिकाणी मिळवलेले यश, थेट सामना झालेल्या १३ जागांपैकी ७ ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिलेली मात आणि घराणेशाहीचा कोणताही वारसा नसताना समर्थपणे चालवलेला पक्ष यामुळे एकनाथ शिंदे यांचे वजन महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी वाढले आहे.
ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ विक्रमी मताधिक्याने जिंकून त्यांनी या टापूत आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत शिंदेंच्या उमेदवारांनी घेतलेली मते उद्धव गटाच्या उरात धडकी भरवणारी आहेत.
कुलाबा आणि मलबार हिल मतदारसंघात शिंदे यांच्या उमेदवारांना झालेले मतदान तसेच आदित्य ठाकरे यांच्या वरळी आणि शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्या मतदारसंघात शिंदेनी मारलेली मुसंडी विशेष लक्षवेधी आहे. वायव्य मुंबईत तर शिंदे यांचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव गटाची धाकधूक वाढणार आहे.
आगामी वाटचालीची उत्सुकता
एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह आले तेव्हा शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी १३ खासदार त्यांच्यासोबत आले होते. त्यातील एकही खासदार पराभूत होणार नाही असा विश्वास शिंदे यांनी दिला होता.
मात्र त्यातील काही खासदारांची तिकिटे कापली गेली तर काहीजण पराभूत झाले. त्यांचे पुनर्वसन शिंदे कशा पद्धतीने करतात याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.












Click it and Unblock the Notifications