Diwali rain alert मोठी बातमी! दिवाळीत पाऊस; पुढील 5 दिवस दक्षता बाळगा; 'या' जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'
Diwali rain alert : भारतीय हवामान विभागाने (IMD) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या काही भागांत पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे ऐन सणासुदीत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) पुणे विभागाने महाराष्ट्रातील हवामानाबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, राज्यात आगामी पाच दिवस काही भागांत पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

विभागनिहाय हवामानाचा अंदाज खालीलप्रमाणे
दक्षिण कोकण (सिंधुदुर्ग)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील चार दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र - घाट विभाग
नाशिक जिल्हा व घाट विभाग: आज (रविवार) या भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
कोल्हापूर जिल्हा व घाट विभाग
पुणे हवामान विभागाने कोल्हापूर आणि घाट विभागासाठी पुढील चार दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
पुणे घाट विभाग
पुढील तीन दिवस मेघगर्जना आणि वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व घाट विभागांच्या परिसरात आजपासून पुढील दोन ते तीन दिवसांसाठी 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
पुणे शहर आणि आसपासचा परिसर
पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहील, मात्र दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा
आज मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या अंदाजामुळे संबंधित जिल्ह्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
दिवाळीत पावसाची शक्यता लक्षात घेऊन काळजी घ्यावी
उत्सव आणि समारंभ आऊटडोअर (मोकळ्या जागेतील) कार्यक्रम असल्यास, पाऊस आणि वादळापासून बचाव करण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार ठेवा. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी किंवा लक्ष्मीपूजन (दिवाळीतील मुख्य दिवस) च्या वेळी पावसाची शक्यता असल्यास, रोषणाईसाठी वापरलेले दिले, पणत्या किंवा विद्युत उपकरणे सुरक्षित ठिकाणी ठेवा.
सुरक्षा आणि दक्षता : विजांचा कडकडाट होत असताना झाडांखाली, मोकळ्या मैदानात किंवा उंच ठिकाणी उभे राहू नका. सुरक्षित निवारा शोधा. वादळ व पावसामुळे झाडे किंवा वीजेचे खांब कोसळण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रवासादरम्यान सावधगिरी बाळगा. घराबाहेर पडण्यापूर्वी हवामान अंदाज तपासा आणि छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवा. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी, शेतकऱ्यांनी काढणीला आलेले पीक सुरक्षित ठिकाणी साठवावे.
प्रवासाचे नियोजन काळजीपुर्वक करा
लांबचा प्रवास करण्यापूर्वी रस्त्यांवरील हवामान आणि परिस्थितीचा अंदाज घ्या. विशेषतः घाट भागात जास्त पाऊस व वाऱ्याची शक्यता असल्याने प्रवास जपून करा.












Click it and Unblock the Notifications