महाराष्ट्राचा बिहार झाला... विजय शिवतारेंच्या नाराजीनाट्याचा भडका
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी झाला. महायुतीच्या ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्या शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद धरुन १२ मंत्रिपदे आली. मंत्रिमंडळात फक्त ११ नेत्यांनाच संधी मिळाल्यामुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय शिवतारे नाराज झाले. प्रसारमाध्यमांनी त्यांना मंत्रिपदाबाबत विचारताच त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.

पवार-शिंदे गटात नाराजी
रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकनाथ शिंदे गटाच्या ११ तर अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर दोन्ही पक्षातील इच्छुक प्रचंड नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी थेट माध्यमांसमोर बोलून दाखवली. आज सकाळी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मनातील खदखद बोलून दाखवत अधिवेशन सोडून थेट नाशिकला जाण्याचे संकेत दिले. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातील नेते विजय शिवतारे यांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
काय म्हणाले विजय शिवतारे?
मंत्रिपदातून डावललंय का, असा प्रश्न विचारताच विजय शिवतारे म्हणाले, "माझ्यासाठी मंत्रिपद इतकं महत्त्वाचं नाही. मला लोकांनी निवडून दिल आहे. मला त्यांच्यासाठी काम करायचे आहे. पण दु:ख एवढंच आहे की महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे..? पूर्वी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असे विभाग करुन त्या-त्या नेत्यांना संधी दिली जायची. त्यातून आमच्यासारख्यांनी महाराष्ट्र पुढे नेला. आपण कुठे तरी आता मागे चाललोय. आपण बिहारच्या मार्गाने चाललोय", असे म्हणत विजय शिवतारे यांनी नाराजी स्पष्ट शब्दांत मांडली.
वरिष्ठ नेत्यांवर नाराजी?
पुढे बोलताना शिवतारे म्हणाले, "मला नाव कट झाल्याबद्दल अजिबात दु:ख नाही. पण ज्यापद्धतीने विश्वासात घेऊन काम करायला हवं, पण ते न झाल्याने नाराजी १०० टक्के आहे. अडीच वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही. मला गरज नाही. माझ्या मतदारसंघातील कामे मुख्यमंत्री आणि इतरांकडून करुन घेणे, इतकंच माझं काम आहे. मंत्रिपदावरुन मला राग नाही. पण वागणुकीवरुन प्रचंड राग आहे", असे विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले.












Click it and Unblock the Notifications