माझ्या हत्येचा कट १५ दिवसांपूर्वीच झाला होता; आ. किणीकर यांचा गौप्यस्फोट, दोघे ताब्यात
शिवसेना शिंदे गटाचे अंबरनाथचे आ. डाँ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट उघड झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटकही केली आहे. आता आ. किणीकर यांच्या एका विधानाने चांगलीच खळबळ उडाली आहे. आ. किणीकर यांच्या मते त्यांच्या हत्येचा कट हा १५ दिवसांपूर्वीच रचला गेला होता.

काय म्हणाले किणीकर
हत्येचा कट उघड झाल्यानंतर आ. किणीकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझ्या हत्येचा कट शिजला जात असल्याची माहिती माझ्या काही लोकांनी मला दिली. त्यानंतर मी पोलिसांकडे जाऊन हे प्रकरण सांगितले. त्यावेळी पोलिस या प्रकरणाची माझ्या अगोदरपासून चौकशी करत असल्याचे मला समजले. म्हणजे पोलिसांनाही माझ्या अगोदरपासून हा कट माहिती होता. माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे, असे आ. किणीकर यांनी स्पष्ट केले.
पोलिसांवर विश्वास
आ. किणीकर पुढे म्हणाले, ठाण्याच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गेल्या १५ दिवसांपासून हा कट रचला जात होता अशी माझी माहिती आहे, असेही किणीकर म्हणाले. ते म्हणाले, मला पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे आणि याबाबत मी आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पूर्ण माहिती दिली आहे, असेही किणीकर यांनी स्पष्ट केले.
दोन जणांना घेतले ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणात अंबरनाथ शहरातील दोघांना ताब्यात घेतले आहे. त्याशिवाय अन्य दोघांना हजर होण्याची नोटिसही बजावली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काही मोठी नावे येऊ शकतात, अशीही शक्यता व्यक्त होत आहे. आमदार डॉ बालाजी किणीकर हे चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या प्रचारात स्थानिक शिवसेनेचा एक गट सक्रिय नसल्याची चर्चा होती. त्यांचे पक्षांतर्गत विरोधकही उघडपणे त्यांचा विरोध करताना दिसले होते. त्यामुळे या प्रकरणामुळे स्थानिक राजकारण ढवळून निघाले आहे.












Click it and Unblock the Notifications