महाराष्ट्र शरद पवारांनीच पेटता ठेवला, भुजबळांचा थेट आरोप
मुंबई : तुमचा अजित पवार व छगन भुजबळांवर आहे. मग सगळ्या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय..? असा सवाल करत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढायचे सोडून, विरोधी पक्षाला काहीतरी सल्ले देऊन ते महाराष्ट्र पेटविण्याचे काम करत आहेत, असा थेट आरोपही भुजबळांनी पवारांवर केला. बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळ बोलत होते.

विरोधकांचा बहिष्कार पवारांमुळे?
भुजबळ म्हणाले की, ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी शरद पवारांना घेऊन यावं, अशी विनंती जितेंद्र आव्हाडांना केली. ज्येष्ठ नेते म्हणून पवारांनी त्या बैठकीला येणं अपेक्षित होते. पण बारामतीतून कुणाचातरी फोन आला आणि विरोधकांनी बैठकीवरच बहिष्कार टाकला, असा आरोप करुन छगन भुजबळांनी शरद पवारांवर टिकेची झोड उठवली.
तुमची स्पष्ट भूमिका सांगा...
शरद पवारांमुळे विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा आरोप करत भुजबळ म्हणाले, तुमचा राग अजित पवार आणि छगन भुजबळांवर असेल. पण मग ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलंय..? तुमच्या बारामतीमध्ये माळी, मराठा, धनगर समाजाने तुम्हाला मंतं दिली. पण सगळ्यांच्या बाबतीत तुमची भूमिका काय हे का सांगत नाहीत, असा सवालही भुजबळांनी शरद पवारांना विचारला.
शरद पवारांवर थेट आरोप
राज्यातल्या सामाजिक प्रश्नांवर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावं आणि चर्चा करून हा प्रश्न सोडवावा, असंही छगन भुजबळ म्हणाले. शरद पवारांनीच महाराष्ट्र पेटता ठेवला असा आरोपही भुजबळांनी केला. भुजबळ म्हणाले, विरोधकांना पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि महाराष्ट्र पेटवायचा असा उद्योग सुरू आहे. ज्यावेळी निवडणूक येईल त्यावेळी तुमची भूमिका मांडा, आम्ही आमची मांडू. पण राज्यातील सामाजिक प्रश्न पेटत असताना तुम्ही मुद्दामहून शांत का बसताय, असा सवालही छगन भुजबळांनी शरद पवारांना विचारला.












Click it and Unblock the Notifications