'आपली मुंबई, सर्वांसाठी मुंबई'; अजित पवारांच्या NCPचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा-आश्वासनांचा पाऊस!
Ajit Pawar NCP Releases Manifesto for Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले असून, महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 'स्वबळाचा' नारा देत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. बुधवार, ७ जानेवारी २०२६ रोजी पक्षाने मुंबईच्या कायापालटाचा आणि सर्वसमावेशक विकासाचा आराखडा सादर केला. "शिव-शाहू-फुले-आंबेडकर" यांच्या विचारधारेवर आधारित हा जाहीरनामा मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचे स्वप्न मांडतो.

आरोग्य: 'आरोग्य संपन्न नगर' उपक्रम
मुंबईकरांच्या आरोग्याला प्राधान्य देत राष्ट्रवादीने महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या आहेत.
UHWC केंद्रांची निर्मिती : २,४०७ महानगरपालिका रुग्णालयांचे 'शहरी आरोग्य आणि कल्याण केंद्रांमध्ये' रूपांतर करून ते अत्याधुनिक निदान आणि टेलि-कन्सल्टेशन सुविधांनी सुसज्ज केले जातील.
प्रत्येक वॉर्डात आरोग्य केंद्र : प्रत्येक प्रभागात प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे आयोजित केली जातील.
डिजिटल डॅशबोर्ड : सर्व रुग्णालयांमध्ये दैनंदिन माहितीसाठी अत्याधुनिक डॅशबोर्ड सिस्टम असेल.
शाळा आरोग्य कार्ड : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना वैयक्तिक आरोग्य कार्ड दिले जाईल.
शिक्षण: एआय आणि डिजिटल क्रांती
शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी पक्षाने पुढील पावले उचलण्याचे ठरवले आहे:
स्मार्ट क्लासरूम्स : महापालिका शाळांमध्ये एआय-आधारित स्मार्ट वर्गखोल्या आणि डिजिटल बोर्ड्स लावले जातील.
कौशल्य विकास : माध्यमिक स्तरावर औद्योगिक भागीदारीतून व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू केले जातील.
अभ्यास केंद्रे : प्रत्येक प्रभागात करिअर मार्गदर्शन केंद्रे, सुसज्ज ग्रंथालये आणि मोफत अभ्यास केंद्रे उभारली जातील.
गृहनिर्माण आणि कर सवलत
मुंबईतील घरांच्या समस्येवर राष्ट्रवादीने मोठी आश्वासने दिली आहेत:
मालमत्ता कर माफी : ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवर मालमत्ता कर पूर्णपणे माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
१ लाख नवीन घरे : खाजगी जमिनीवर परवडणाऱ्या गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून १,००,००० नवीन घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे.
SRA गती : झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देऊन रहिवाशांना मालकी हक्क आणि मूलभूत सुविधा मिळवून दिल्या जातील.
वाहतूक आणि पायाभूत सुविधा
रस्त्यांचे जाळे : पाच वर्षांत ५०० किलोमीटर नवीन रस्ते बांधण्याचे आणि रस्ते धूळमुक्त करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री वापरण्याचे वचन दिले आहे.
स्मार्ट ट्रॅफिक : वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एआय-आधारित "स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल" आणि पुरेशा पार्किंग सुविधांवर भर दिला जाईल.
अतिक्रमणमुक्त पदपथ : ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी सुरक्षित चालण्यायोग्य पदपथ सुनिश्चित केले जातील.
महिला सुरक्षा आणि युवा रोजगार
महिला सक्षमीकरण : 'सुरक्षित मुंबई' मोहिमेअंतर्गत सीसीटीव्ही जाळे वाढवणे, हेल्पलाइन आणि कार्यरत महिलांसाठी वसतिगृहे बांधली जातील. महिला उद्योजकांसाठी स्वस्त कर्ज योजनाही प्रस्तावित आहेत.
रोजगार संधी : आयटी, पर्यटन आणि स्टार्टअप क्षेत्रात रोजगार वाढवण्यासाठी वॉर्ड स्तरावर कौशल्य विकास केंद्रे आणि रोजगार मेळे आयोजित केले जातील.
पर्यावरण: 'हरित मुंबई'चा संकल्प
प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी १० लाख झाडे लावण्याचे आणि उद्यानांचा विस्तार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
सार्वजनिक वाहतुकीत ई-बसेस आणि सीएनजी वाहनांना प्रोत्साहन देऊन मुंबईला 'क्लायमेट रिझिलिएंट' (हवामान बदलाला तोंड देणारे) शहर बनवण्यावर भर दिला जाईल.
काय म्हणाले अजित पवार?
"मुंबई हे केवळ शहर नाही, तर ती कोट्यवधी लोकांची स्वप्नभूमी आहे. आमचा जाहीरनामा स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाच्या मूल्यांवर आधारित असून आम्ही मुंबईला जागतिक स्तरावर एक समृद्ध आणि सुरक्षित शहर म्हणून ओळख मिळवून देऊ." - अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.












Click it and Unblock the Notifications