राज्यात एकमेकांच्या जीवावर उठले; पण चंद्रपुरात भाजपची खेळी! ठाकरेंच्या सेनेला सोबत घेत सत्ता काबीज
BJP Shiv Sena UBT Alliance : गेल्या काही दिवसांपासून त्रिशंकू अवस्थेत अडकलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तानाट्याचा अखेर मंगळवारी अत्यंत नाट्यमय शेवट झाला.
राजकीय विश्लेषकांचे सर्व अंदाज फोल ठरवत भाजपने शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (शिवसेना उबाठा) सोबत घेऊन सत्तेचे समीकरण जुळवले. या अभूतपूर्व युतीमुळे भाजपच्या संगीता खांडेकर अवघ्या एका मताच्या फरकाने चंद्रपूरच्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. या धक्कादायक निकालामुळे काँग्रेसच्या गोटात शांतता पसरली असून भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

एका मताचा थरार: असा रंगला निवडणूक निकाल
मंगळवारी झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांना ३२ मते मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवाराला ३१ मतांवर समाधान मानावे लागले. बहुमतासाठी ३३ चा आकडा गाठणे आवश्यक असताना, निवडणुकीतील काही तांत्रिक व राजकीय गणिते भाजपच्या पथ्यावर पडली:
वंचितची अनुपस्थिती: वंचित बहुजन आघाडीचे २ नगरसेवक मतदानावेळी गैरहजर राहिले.
एमआयएमची भूमिका : एमआयएमच्या एका नगरसेवकाने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.
विजयी आघाडी : यामुळे ३२ मते मिळवूनही भाजप सर्वात मोठा गट ठरला आणि संगीता खांडेकर विजयी घोषित झाल्या.
भाजप-ठाकरे गट युतीचा 'पाॅवर फॉर्म्युला'
राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे भाजप आणि उद्धव ठाकरे गट चंद्रपुरात एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन्ही पक्षांत झालेल्या सत्तावाटपाच्या करारानुसार, महापौर पद पाच वर्षांच्या कार्यकाळात महापौर पद सव्वा-सव्वा वर्षांच्या दोन टर्ममध्ये विभागून घेण्यावर एकमत झाले आहे. तसेच उपमहापौर पद ठाकरे गटाचे प्रशांत दानव यांची उपमहापौरपदी वर्णी लागणार आहे. तसेच, पहिल्या सव्वा वर्षासाठी प्रतिष्ठेचे मानले जाणारे स्थायी समितीचे अध्यक्षपद ठाकरे गटाला देण्यात आले आहे.
संख्याबळाचे गणित: सत्तेचा मार्ग कसा सुकर झाला?
सुरुवातीला भाजपचे स्वतःचे २३ आणि शिंदे गटाचा १ असे एकूण २४ नगरसेवक होते. मात्र, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील ६ नगरसेवक आणि २ अपक्ष नगरसेवकांनी भाजपला साथ दिली. यामुळे भाजपचे संख्याबळ ३२ वर पोहोचले. दुसरीकडे, २७ नगरसेवक असलेल्या काँग्रेसला जनविकास सेनेच्या ३ सदस्यांची साथ मिळूनही त्यांचे संख्याबळ ३१ वरच अडकले.
राजकीय वळण: "कोणत्याही परिस्थितीत भाजपला चंद्रपुरात सत्ता मिळू देणार नाही," असे विधान खासदार संजय राऊत यांनी सकाळीच केले होते. मात्र, काही तासांतच स्थानिक समीकरणे बदलली आणि ठाकरे गटाने भाजपच्या गोटात शिरकाव केला.
काँग्रेसच्या पराभवाचे कारण: अंतर्गत गटबाजी की रणनीतीचा अभाव?
निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली होती. मात्र, या बैठकीत जागावाटपावरून तीव्र मतभेद उफाळून आले. संदीप गिऱ्हे संतप्त होऊन बैठकीतून बाहेर पडले आणि काही वेळातच भाजप नेते किशोर जोरगेवार यांनी ठाकरे गटाच्या पाठिंब्याची अधिकृत घोषणा केली. काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांचा फायदा उठवत भाजपने अचूक वेळी आपली चाल खेळली.












Click it and Unblock the Notifications