चमकोगिरीवर नाही, कामावर तिकीट; बावनकुळे यांचा भाजप कार्यकर्त्यांना स्पष्ट इशारा
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांची चाहूल लागलेली असतानाच राजकीय हालचालींना गती मिळाली आहे. नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या आगामी धोरणावर आणि उमेदवारीच्या निकषांवर स्पष्ट भाष्य केलं.

बावनकुळे यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं की, महापालिका निवडणुकीत केवळ नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना तिकीट देण्यात येणार नाही. "नेत्यांपुढे चमकोगिरी करून तिकीट मिळणार नाही. काम करणाऱ्यांनाच संधी मिळेल," असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
त्याचबरोबर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्य तिथीही जाहीर केली. "येणाऱ्या १५ ऑगस्टनंतर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल," असे ते म्हणाले. या विधानामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली असून, आता तिकीट मिळवण्यासाठी अधिक आक्रमकपणे काम करावे लागेल, हे स्पष्ट आहे.
या कार्यशाळेचे आयोजन मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळातील यशाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी करण्यात आले होते. "गेल्या ११ वर्षांत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे निर्णय झाले, त्यातून देशात प्रगती झाली आहे. आता हे सर्व काम जनतेसमोर मांडणं आवश्यक आहे," असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या धोरणांचे समर्थन करताना बावनकुळे यांनी 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत म्हटले, "पहलगाम हल्ल्यानंतर जो प्रतिहल्ला झाला, तो निर्णय आमच्याच सरकारने घेतला. हे दुसरे सरकार कदाचित करू शकले नसते."
कार्यशाळेत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी देखील आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी '१०० प्लस' असा आत्मविश्वास व्यक्त केला. "महायुती होईल तर ठीक, अन्यथा आपण स्वबळावर निवडणूक लढवू," असा संदेशही त्यांनी दिला. कार्यकर्त्यांमध्ये गटबाजी थांबवून संघटितपणे काम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकांनी गिरीश महाजन यांचा संभाव्य पालकमंत्री म्हणून उल्लेख केला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये चर्चेला उधाण आले.












Click it and Unblock the Notifications