बदलापूर आंदोलन पुर्वनियोजित? पोलिसांकडे काॅल रेकॅार्डिंग! आजवर 68 जण अटकेत शनीवारी महाराष्ट्र बंद
Badlapur School Girl Rape Case : बदलापुरातील आंदोलन हे पूर्वनियोजित असल्याची शक्यता पाहून पोलिस तपास करीत आहेत. यासंबंधी फोन आणि व्हाईस रेकाॅर्डींग पोलिसांच्या हाती लागल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान आंदोलन प्रकरणी आतापर्यंत 68 जणांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे येत्या शनीवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे अशी माहिती महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर आज देण्यात आली आहे.

व्हाईस रेकाॅर्डींग पोलिसांच्या हाती?
आंदोलनासाठी करण्यात आलेले काही फोन आणि व्हाईस रेकॅार्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहेत. हे आंदोलन पूर्व नियोजीत असल्याचेही पोलीस तपासात समोर आलं आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी 68 जणांना अटक केली आहे. यात कल्याण रेल्वे पोलिसांनी 28 जणांना तर बदलापूर पूर्व पश्चिम पोलिसांनी 40 जणांना अटक केली. तत्पूर्वी या मुलींवर अत्याचार करणाऱ्या संबंधित शाळेतील सफाई कामगार संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
300 जणांविरोधात गुन्हा दाखल
बदलापूर आंदोलन प्रकरणी आतापर्यंत 300 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रेलरोको, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, पुर्वनियोजीत गुन्हेगारी कट रचणे, असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे अजूनही संशयित आंदोलकांची धरपकड केली जात आहे.
24 ऑगस्टला 'महाराष्ट्र बंद' ची हाक
बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर 24 ऑगस्ट रोजी 'महाराष्ट्र बंद' ची हाक देण्यात आली आहे, या बंदमध्ये समाजातील विविध घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना केले. राज्यातील विरोधी पक्षांच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला असल्याचे पटोले म्हणाले.
मविआची पार पडली बैठक
मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र बंदची हाक देण्याचे ठरले असल्याचे पाटोले यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. पाटोले म्हणाले, राज्यात मुली सुरक्षित नाहीत. रोज महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होत आहे. ज्या शाळेत बदलापूरचे प्रकरण घडले ती शाळा भाजपशी निगडीत असल्यामुळे त्यांना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अशा घटनांचे सरकारला काहीएक देणेघेणे नाही. त्यामुळे आम्ही ही बंदची हाक दिल्याचे ते म्हणाले.
काय म्हणाले जयंत पाटील?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, या प्रकरणामध्ये कोणीही राजकीय फायदा घेत नाही. राज्यात अत्याचाराने परिसीमा गाठली आहे. बालक, महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात दुप्पट, तिप्पट वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही हा बंदचा पुकार दिल्याचे ते म्हणाले.












Click it and Unblock the Notifications