राजीनामा देण्याचा निर्णय़ हा केजरीवालांना उशीरा सुचलेलं शहाणपण; अण्णा हजारेंचा खोचक टोला
Anna Hazare on Arvind Kejriwal : केजरीवालांचं मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याबाबतच भाष्य म्हणजे उशिराने सुचलेलं शहाणपण असल्याचा टोला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लगावला.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे आज एका कार्यक्रमात जाहीर केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना चर्चा रंगल्या आहेत. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी देखील केजरीवालांच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. तर कॉंग्रेसच्या वतीने देखील मत व्यक्त करण्यात आले.

दरम्यान, केजरीवाल यांच्या राजकीय करिअरला सुरुवात होण्यापूर्वीच ज्यांनी त्यांना ओळख निर्माण करून दिली. ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केजरीवालांच्या निर्णयावर मोठे विधान केले आहे.
अण्णा हजारे काय म्हणाले?
अण्णा हजारे म्हणाले की, आपण केजरीवाल यांना सुरुवातीपासून समाजसेवा करा आपण खूप पुढे जाल असा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी तो ऐकला नाही आणि शेवटी त्यांना या परिस्थितीला सामोरे जावं लागलं. आता त्यांना याची जाणीव झाली असावी, असे वाटते. त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा त्यांचा निर्णय हा उशीराने सुचलेलं शहाणपण आहे, असे ते म्हणाले.
अरविंद केजरीवाल काय काय म्हणाले होते?
सीता जेव्हा वनवासातून परतली तेव्हा तिला अग्नीपरीक्षा द्यावी लागली होती. मी आज अग्नीपरीक्षा देतोय. दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणूक आहे. माझी मागणी आहे की, ही निवडणूक नोव्हेंबर महिन्यात घ्यावी. महाराष्ट्रासोबत दिल्लीची विधानसभा निवडणूक होऊ दे. जनतेचा निर्णय येईपर्यंत मी मुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाही. आता जनतेने मला पुन्हा निवडून दिल्यानंतरच मी आणि मनिष सिसोदिया पदांची जबाबदारी स्वीकारु, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications