पाकने ठरवावे नकाशावर अस्तित्व ठेवायचे की नाही; इंडियन आर्मीचा पाकड्यांना थेट इशारा, नेमका वाद काय?
india pakistan war : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानच्या सर्वोच्च लष्करी व राजकीय नेतृत्वाकडून आलेल्या विधानांमुळे दक्षिण आशियातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे.
शांतता आणि संयमाच्या आवाहनाऐवजी, दोन्ही बाजूंनी अत्यंत थेट आणि प्रक्षोभक भाषा वापरली जात आहे. विशेषतः भारतीय लष्करप्रमुखांनी 'पाकिस्तानने नकाशावर राहायचे की नाही, याचा विचार करावा' या दिलेल्या थेट इशाऱ्याला, पाक सैन्याने 'आता युद्ध झाल्यास भयंकर विनाश होईल, पाकिस्तान मागे हटणार नाही' असे अत्यंत कठोर प्रत्युत्तर दिले आहे.

अण्वस्त्रधारी शेजारी देशांमध्ये सुरू असलेल्या या शाब्दिक युद्धामुळे केवळ दोन देशांमध्येच नाही, तर संपूर्ण दक्षिण आशियातील शांतता आणि स्थैर्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूंनी दिलेले हे थेट इशारे आणि प्रति-इशारे काय आहेत. याचा सविस्तर आढावा या लेखात घेतलेला आहे.
VIDEO | Anupgarh, Rajasthan: Indian Army Chief General Upendra Dwivedi says, "This time we will not maintain the restraint that we did in Operation Sindoor 1.0... this time we will do something that Pakistan will have to think whether it wants to be in Geography or not. If… pic.twitter.com/YXoHUL7xKv
— Press Trust of India (@PTI_News) October 3, 2025
पाकिस्तानी लष्कराचा भारताला 'विनाशकारी' इशारा
शनिवारी रात्री, पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंग आयएसपीआर (ISPR) ने एक अधिकृत निवेदन जारी करून भारताला थेट इशारा दिला. या निवेदनात म्हटले आहे की, जर दोन्ही देशांमध्ये शत्रुत्वाचा एक नवीन टप्पा सुरू झाला, तर त्याचा परिणाम 'भयंकर विनाश' होईल. "आम्ही संकोच न करता पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ आणि पाकिस्तान मागे हटणार नाही," असे त्यांनी ठणकावून सांगितले.
पाकिस्तानी लष्कराने भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करी व हवाई दल प्रमुखांच्या विधानांना 'बेजबाबदार' आणि 'आक्रमकता भडकवणारे' ठरवले. त्यांच्या मते, यामुळे दक्षिण आशियातील शांतता आणि स्थैर्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
'नकाशा'वरील अस्तित्वावरून थेट प्रति-इशारा
भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिलेल्या "पाकिस्तानला नकाशावर राहायचे की नाही याचा विचार करावा लागेल" या विधानाला पाकिस्तानी सैन्याने अत्यंत कठोर उत्तर दिले. ते म्हणाले की, पाकिस्तानला नकाशावरून मिटवण्याच्या कल्पनेचा विचारही केल्यास, भारताला हे माहित असले पाहिजे की अशी परिस्थिती उद्भवल्यास दोन्ही बाजू पूर्णपणे नष्ट होतील.
पाकिस्तानी सैन्याने यापुढे जाऊन इशारा दिला की, "पाकिस्तानचे लोक आणि सशस्त्र दल शत्रूच्या प्रदेशाच्या प्रत्येक कोपऱ्यात लढाई नेण्याची क्षमता आणि दृढनिश्चय बाळगतात. यावेळी, आपण भारतीय भूभागाच्या सर्वात दूरच्या भागात लक्ष्य करून 'भौगोलिक सुरक्षेच्या मिथकाला' मोडून काढू."
तीन भारतीय विधाने, पाकचा प्रतिसाद!
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काय म्हणाले?
"भारताच्या अभिमानाचा आणि सन्मानाचा प्रश्न असेल तर, देश कधीही तडजोळ करणार नाही. भारत आपली एकता आणि अखंडता जपण्यासाठी गरज पडल्यास कोणतीही सीमा ओलांडू शकतो."
लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी काय म्हणाले?
ऑपरेशन सिंदूर १.० दरम्यान भारताने घेतलेला संयम यावेळी वापरणार नाही. यावेळी, आम्ही पुढील कारवाई करू आणि अशी कारवाई करू की पाकिस्तानला भू-राजकीय परिदृश्यात राहायचे आहे की नाही याचा पुनर्विचार करावा लागेल. दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे लागेल."
हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग काय म्हणाले?
त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' चा संदर्भ देत सांगितले की, भारताने अंदाजे १२ ते १३ पाकिस्तानी विमाने नष्ट केली. या विमानांमध्ये पाच लढाऊ विमाने आणि एक सी-१३० वाहतूक विमान पाकिस्तानी हवाई तळ आणि हँगरवर असताना नष्ट करण्यात आले.
पाकिस्तानचा दहशतवाद आणि ऑपरेशन सिंदूर!
पाकिस्तानी सैन्याने आपल्या निवेदनात 'बळींचे कार्ड खेळून नफा मिळवल्याचा' भारतावर आरोप केला, तर भारताकडून सीमापार दहशतवाद पसरवला जात असल्याचे म्हटले.
या संदर्भात, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख महत्त्वाचा आहे. ७ मे रोजी पहाटे १:३० वाजता भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले होते. या कारवाईत लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा अड्डा लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे भारताने सांगितले होते.
पाकिस्तानने आपल्या निवेदनात यापूर्वीच्या संघर्षात त्यांच्या 'लढाऊ विमानांचे नुकसान आणि पाकिस्तानच्या लांब पल्ल्याच्या शस्त्रांचा नाश' भारताने विसरल्याचा उल्लेख करत, भारतावर 'सामूहिक स्मृतिभ्रंशाने ग्रस्त' असल्याचा आरोप केला आहे.












Click it and Unblock the Notifications