कुवेत अग्निकांड दुर्घटनेमुळे केरळवर दुःखाचा डोंगर कोसळला
कुवेतच्या मंगाफ येथे बुधवारी भारतीय कामगारांची वसाहत असलेल्या एका इमारतीला लागलेल्या आगीत ४९ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झाले होते. मृतांमध्ये केरळच्या ४५ नागरिकांचा समावेश होता. शुक्रवारी विशेष विमानाने मृतदेह केरळमध्ये आणण्यात आले. या दुर्घटनेमुळे केरळवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कोचीन विमानतळावर मान्यवरांची रीघ
शुक्रवारी सकाळपासूनच कोचीन विमानतळावर मान्यवरांची रीघ लागली होती. यात केंद्रीय मंत्री सुरेश गोपी, केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन, केरळचे महसूलमंत्री राजन, आरोग्य मंत्री विना जॉर्ज तसेच अन्य मंत्र्यांचा समावेश होता. पुढील औपचारिकता त्वरेने पूर्ण करण्यात येतील असे आरोग्यमंत्री विना जॉर्ज यांनी सांगितले.
आरोग्य मंत्र्यांना कुवेतला जाण्याची परवानगी नाकारली
कुवेतमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी कुवेतला जाण्याची परवानगी राज्याच्या आरोग्य मंत्री विना जॉर्ज यांनी केंद्राकडे मागितली होती. मात्र केंद्राने ही परवानगी नाकारली. त्याबद्दल राज्याचे महसूलमंत्री के राजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केरळच्या जखमी नागरिकांना तिथे योग्य सुविधा मिळाव्यात, याची काळजी घेणे हाच आमचा उद्देश होता, मात्र तांत्रिक कारणांमुळे केंद्राने परवानगी नाकारली, अशी प्रतिक्रिया राजन यांनी दिली.
पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन
कुवेतमधील दुर्घटना घडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या उपस्थितीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री यांनी पंतप्रधानांच्या सूचनेवरून कुवेतला भेट दिली. दुर्घटनेतील मृतदेह भारतात आणणे आणि जखमींवर उपचार करण्याची काळजी त्यांनी घेतली. त्यामुळे राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी तिथे जाण्याची आवश्यकता नाही असे भाजप नेते व्ही मुरलीधर यांनी सांगितले.
कुवेत सरकारकडून चौकशीचे आदेश
कुवेत टाइम्सच्या वृत्ताच्या अहवालानुसार कुवेतचे अंतर्गत व्यवहार मंत्री शेख फहाद अल युसुफ यांनी मंगाफ इमारतीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश दिले आहे. तसेच इमारतीचे चौकीदार आणि अन्य काम्राचार्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. जे काही घडले ते कंपनी आणि इमारत मालकाच्या स्वार्थाचा परिणाम आहे, अशा दुर्घटना भविष्यात घडू नयेत यासाठी संपूर्ण खबरदारी घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दुर्घटनाग्रस्त इमारतीत १६० लोकांचे वास्तव्य
दुर्घटनाग्रस्त इमारत ६ मजली आहे. या इमारतीतील स्वयंपाकघरातून आगीला सुरुवात झाली. अधिकार्यांनी आगीची कारणे शोधण्यास सुरुवात केली आहे. या इमारतीत १६० लोक राहत होते आणि ते एकाच कंपनीसाठी काम करीत होते. वृत्तवाहिन्यांच्या हवाल्यानुसार ज्या इमारतीला आग लागली ती इमारत भारतीय कामगारांच्या निवासासाठी वापरण्यात येत होती.












Click it and Unblock the Notifications