भारत शेख हसिना यांना बंगालादेशच्या ताब्यात देईल का? हसिना अन् त्यांच्या मंत्र्यांचं अटक वॉरंट निघणार
Bangladesh violence :बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसिना यांच्याविरोधात हत्येचा खटला चालवण्याकरिता त्यांचे भारताकडून प्रत्यार्पण करण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील, असे बांगलादेशने आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादात (आयसीटी) स्पष्ट केले. हसिना यांच्यासह सर्व फरार आरोपींविरुद्ध लवकरच अटक वॉरंट जारी करणार असल्याचेही सरकारने सांगितले.
पाच ऑगस्ट रोजी बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्यावरून हिंसक आंदोलन सुरू झाले असता शेख हसिना यांनी राजीनामा देऊन भारतात पलायन केले. सध्या त्यांना भारताने आश्रय दिला आहे.

प्रत्यार्पण करारानुसार प्रयत्न
बांगलादेशचे आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादातील मुख्य वकील मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी राजधानी ढाका येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, भारतासोबतच्या प्रत्यार्पण करारानुसार माजी पंतप्रधान हसिना यांना मायदेशी परत आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जाणार आहेत.
गत जुलै आणि ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान झालेल्या सामूहिक हत्येच्या आरोपावरून त्यांच्या विरोधात खटला भरला जाईल, असे मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी सांगितले. आम्ही आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाकडे सामूहिक हत्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या संदर्भात शेख हसिना यांच्यासह सर्व फरार आरोपींविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अगोदर करणार पुरावे गोळा
आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादात नवीन खटल्यांची सुनावणी घेण्यासाठी कायद्यात योग्य त्या दुरुस्त्या करण्याबाबत आम्ही सरकारशी सल्लामसलत करणार आहोत. त्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत. आरोपींविरुद्धची माहिती, कागदपत्रे आणि पुरावे देशभरातून गोळा करावे लागतील. त्याची पडताळणी केल्यानंतर ते लवादापुढे सादर केले जातील. हे अतिशय आव्हानात्मक काम आहे, असे इस्लाम म्हणाले.
दरम्यान, शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधी आंदोलनात १,००० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तर, असंख्य जण जखमी झाले आहेत.. या प्रकरणी आंतराष्ट्रीय गुन्हे लवादाने नरसंहार व मानवताविरोधी गुन्ह्यांचा तपास सुरू केला आहे. त्यामुळे शेख हसीना यांचे भारतातून प्रत्यार्पण करण्यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव वाढत आहे. यासंदर्भात ठोस पावले उचलण्याची ग्वाही सरकारने सध्या दिली आहे.
भारत काय निर्णय घेणार?
बांगलादेश आणि भारतामध्ये 2013 मध्ये प्रत्यार्पणाचा करार झाला होता. या करारातील एक महत्त्वाच्या कलमात म्हटलं आहे की, ज्या व्यक्तीचं प्रत्यार्पण केलं जाणार आहे, तिच्यावर करण्यात आलेले आरोप जर राजकीय स्वरुपाचे असतील तर प्रत्यार्पणाची विनंती फेटाळली जाऊ शकते.
त्यामुळं बांगलादेशलासुद्धा या गोष्टीचं पुरेसं आकलन आहे की प्रत्यार्पण कराराअंतर्गत विनंती करून शेख हसिना या भारतातून बांगलादेश आणणं ही गोष्ट सोपी नसणार आहे. अर्थात यामागं कारण आहे, ते म्हणजे प्रत्यार्पण करारात अनेक अटी किंवा तरतूदी आहेत. त्यांचा वापर करून भारत शेख हसिना यांचं प्रत्यार्पण करण्यास नकार देऊ शकतो. इतकंच नाही तर कायदेशीर गुंतागुंत आणि डावपेचांच्या आधारे प्रत्यार्पणाची प्रक्रिया प्रदीर्घ काळ लांबवली जाऊ शकते.












Click it and Unblock the Notifications