बांगलादेशात पुन्हा रक्ताचा सडा! 'या' नेत्याचा मृत्यू; ढाका पेटलं; भारतीय उच्चायुक्तालयावरही हल्ला!
Bangladesh Violence : "भारताचा शेजारील देश बांगलादेश पुन्हा एकदा भीषण यादवीच्या उंबरठ्यावर येऊन उभा ठाकला आहे. गेल्या काही दिवसांपासून धगधगणाऱ्या बांगलादेशातील आंदोलनाचा आज ज्वालामुखी झाला. विद्यार्थी नेता उस्मान हादी याच्या मृत्यूची ठिणगी पडताच राजधानी ढाकापासून ते चितगावपर्यंत हिंसक वणवा पेटला आहे.

हिंसाचाराचे मुख्य कारण काय?
गेल्या आठवड्यात ढाकामध्ये उस्मान हादीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला सिंगापूरला हलवण्यात आले होते, मात्र आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूला विद्यमान व्यवस्था आणि अवामी लीग जबाबदार असल्याचा आरोप करत आंदोलकांनी रस्त्यावर उतरून तांडव सुरू केले आहे.
संतापलेल्या जमावाने केवळ राजकीय कार्यालयेच नव्हे, तर 'प्रथम आलो' सारख्या मोठ्या माध्यम संस्थांची कार्यालयेही पेटवून दिली आहेत. धक्कादायक म्हणजे, हा आक्रोश आता भारताच्या विरोधातही वळला असून चितगावमधील भारतीय सहायक उच्चायुक्तालयाच्या निवासावर जोरदार दगडफेक करण्यात आली आहे. बांगलादेश पुन्हा एकदा अराजकतेच्या गर्तेत का कोसळत आहे? पाहा हा सविस्तर रिपोर्ट...
"वृत्तपत्रांची कार्यालये आणि अवामी लीग लक्ष्य
उस्मान हादीच्या निधनानंतर संतप्त जमावाने अवामी लीग आणि भारताच्या विरोधात घोषणाबाजी करत 'प्रथम आलो' (देशातील सर्वात मोठे बांग्ला वृत्तपत्र) आणि 'डेली स्टार' या प्रमुख वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ले केले. निदर्शकांनी या कार्यालयांना आग लावली असून, आतमध्ये २५ हून अधिक पत्रकार आणि कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भारतीय सहायक उच्चायुक्तालयाच्या निवासावर दगडफेक
हिंसेची ही आग केवळ ढाकापुरती मर्यादित राहिलेली नाही. चितगावमध्ये आंदोलकांनी भारतीय सहायक उच्चायुक्तालयाच्या निवासस्थानावर मध्यरात्री तुफान दगडफेक केली. या हल्ल्यात इमारतीचे मोठे नुकसान झाले असून, तेथे राहणाऱ्या भारतीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भारताचे परराष्ट्र मंत्रालय या संपूर्ण घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे.
सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू
गेल्या आठवड्यात ढाकामध्ये काही अज्ञात बुरखाधारी हल्लेखोरांनी उस्मान हादीवर गोळीबार केला होता. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अधिक उपचारासाठी सिंगापूरला नेण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. ही बातमी बांगलादेशात पोहोचताच विद्यार्थ्यांचा गट रस्त्यावर उतरला आणि हिंसेला सुरुवात झाली.
बांगलादेशात पुन्हा विध्वंस का?
छात्र नेत्याच्या हत्येने बांगलादेशातील दबलेला राजकीय असंतोष पुन्हा उफाळून आला असून चितगावमधील तणाव आता हाताबाहेर गेला आहे. माध्यम संस्थांवरील हल्ल्यांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत असून, विद्यार्थी संघटनांनी आता देशभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. अफवा रोखण्यासाठी इंटरनेटवर निर्बंध लादले असून सरकार शांततेचे आवाहन करत असले तरी परिस्थिती स्फोटक बनली आहे.












Click it and Unblock the Notifications