Vice President Election : देशाला मिळणार 15वे उपराष्ट्रपती; राधाकृष्णन Vs रेड्डी, भाजपचा विजय निश्चित
vice president election 2025 : आज, मंगळवार, 9 सप्टेंबर रोजी भारत आपला 15 वा उपराष्ट्रपती निवडणार आहे. लोकसभेचे 543 आणि राज्यसभेचे 245 असे एकूण 788 खासदार या निवडणुकीत मतदान करतील. सकाळी 10 वाजल्यापासून सुरु झालेल्या मतदानातून भारताला आपला पुढील उपराष्ट्रपती मिळणार आहे. ही निवडणूक सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि विरोधी 'INDIA' आघाडी यांच्यात थेट लढत आहे.
उमेदवार कोण आहेत?
एनडीएने ६८ वर्षीय सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. राधाकृष्णन हे तमिळनाडूचे माजी भाजप प्रदेशाध्यक्ष असून, त्यांनी झारखंडचे राज्यपाल म्हणूनही काम केले आहे. दुसरीकडे, काँग्रेसने ७९ वर्षीय बी. सुदर्शन रेड्डी यांना 'INDIA' आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. रेड्डी हे आंध्र प्रदेशमधील राजकारणी असून, त्यांना प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे.

बलाबल आणि संभाव्य निकाल
संसदेतील सध्याच्या संख्याबळानुसार, राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. एनडीएच्या खासदारांची संख्या ४२२ आहे, तर 'INDIA' आघाडीच्या खासदारांची संख्या ३१९ आहे. जर सर्व खासदारांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले, तर राधाकृष्णन यांना ३१९ मतांनी विजय मिळेल, अशी शक्यता आहे. मात्र, ही निवडणूक गुप्त मतदानाने होत असल्याने क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०१७ मध्ये ११ तर २०२२ मध्ये १५ मते अवैध ठरली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंनी खासदारांना योग्यप्रकारे मतदान करण्याचे प्रशिक्षणही दिले आहे.
कोणते पक्ष निवडणुकीतून बाहेर?
तेलंगणा राष्ट्र समिती (BRS) आणि बिजू जनता दल (BJD) या दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. बीआरएसकडे लोकसभेत ४ खासदार आहेत तर बीजेडीकडे ७ खासदार आहेत. या दोन्ही पक्षांनी कोणत्याही आघाडीला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
त्याचबरोबर शिरोमणी अकाली दलानेही पंजाबमधील पूरस्थितीमुळे या निवडणुकीत भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, एआयएमआयएमने 'INDIA' आघाडीच्या उमेदवाराला तर वायएसआर काँग्रेसने एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.
या निवडणुकीचा निकाल आज संध्याकाळपर्यंत जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची जागा रिक्त झाली होती, त्यामुळे ही निवडणूक घेण्यात येत आहे.
भारतात उपराष्ट्रपतीची निवड कशी केली जाते?
भारतीय संविधानाच्या कलम ६६(१) अंतर्गत उपराष्ट्रपतीची निवड केली जाते.
ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होते, म्हणजेच खासदार कोणत्याही दबावाशिवाय त्यांची निवड नोंदवू शकतात.
या निवडणुकीत फक्त लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात. प्रमाणशीर प्रतिनिधित्व प्रणाली आणि एकल हस्तांतरणीय मत पद्धतीचा वापर करून मतदान केले जाते.
मतदान प्रक्रियेसाठी, खासदार उमेदवारांना प्राधान्यक्रमानुसार (१, २, ३...) चिन्हांकित करतात. जिंकण्यासाठी, उमेदवाराला विशिष्ट कोटा गाठावा लागतो.
जर पहिल्या फेरीत कोणताही उमेदवार हा कोटा गाठू शकला नाही, तर सर्वात कमी मते मिळवणारा उमेदवार बाहेर पडतो.
खासदाराच्या पुढील प्राधान्यानुसार, वगळलेल्या उमेदवाराची मते इतर उमेदवारांमध्ये वाटली जातात.
उमेदवार आवश्यक कोटा ओलांडेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते.












Click it and Unblock the Notifications